संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:34 IST2025-07-02T10:33:27+5:302025-07-02T10:34:11+5:30
आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
मुंबई - भ्रष्टाचार व जनतेची फसवणूक वगैरे विषयांवर आपण नेहमीच बोलत असता. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू असे आपले धोरण आहे. प्रत्यक्षात राज्यातले चित्र नेमके उलटे आहे. कुंपणच शेत खात असून शेत खाणाऱ्यांना सरकारचे अभय असल्याचे स्पष्ट दिसत आहे असं सांगत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राऊत यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या पत्रात संजय राऊत म्हणतात की, आपल्या सभोवती असलेले लोक सरकारला पाठिंबा देण्याची किंमत वसूल करण्यासाठी सरकारी तिजोरीवरच दरोडे टाकीत आहेत. अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सरकारच्या केलेल्या लुबाडणुकीचे प्रकरण माझ्या समोर आले. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी, औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४. गाव मौजे आंबळे येथील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे २०२१ मध्ये जाहीर केले होते. आंबले गावातील रस्ते, पाणी, वीज, वाहतूक व्यवस्था इत्यादी उपलब्ध असून दळण-वळणासाठी तळेगावचे औद्योगिक क्षेत्र, चाकण, पुणे व मुंबई यांना जोडणारे रस्ते आहेत. तसेच सदर भूसंपादनाने आंबळे व नजीकच्या गावांमधील तरुणाईला रोजगार उपलब्ध होत असून या गावाच्या विकासासाठी खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या गावात व त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. तेथे जवळपास १०० फुटांचे खोल मोठे खड्डे केलेले आहेत. या जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नसल्याने ते सर्व खाणीचे गट हे प्रथमदर्शनी सदर राजपत्रामध्ये खाणीच्या जमिनी वगळण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितले.
तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून या औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या गट क्र. १२३,१२५, १४९,१५२,१५३/१,१५४,१५८,१७१/२ व १९५ अशा २९ हेक्टर ८६.१० आर क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत. आमदार शेळके यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे, त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी सुनील शेळके व त्यांचे बंधू सुदाम शेळके यांनी ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जानुसार संपादन जागेच्या बदल्यात पर्यायी क्षेत्र मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेली होती असा आरोप राऊतांनी केला.
दरम्यान, वरील सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केलेले आहे. जवळजवळ १०० फुटांचे खोल मोठे खड़े केलेले आहेत. या जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नाही असे असतानादेखील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय काढून सदरच्या जमिनी संपादन करून त्याबदल्यात आंबळे गावाच्या गट क्र. १३८, १४०/१,१४०/२,१४२/२ या जमिनींचे क्षेत्र २९ हेक्टर ८६.१० आर पर्यायी क्षेत्र देत आहेत. याबाबत तसा प्रस्तावदेखील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. आज दगडखाण केलेल्या बऱ्याच जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर झालेल्या आहेत असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं.
मा.मुख्यमंत्री
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2025
देवेंद्र फडणवीस जी,
काय सुरू आहे महाराष्ट्रात?
थांबवा ही लुटमार!
@Dev_Fadnavis
@cbawankule
@AjitPawarSpeaks
@PMOIndia
@AmitShah pic.twitter.com/ClGyjIXF43
चौकशीची केली मागणी
आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात?. भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांची राहती घरे व बागायती जमिनी आपण घेता त्यांना कधीही आपण बदली जमिनी दिल्या नाहीत, त्यांना हा न्याय का नाही? अशा अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन रक्कम स्वीकारलेली आहे, ती परत घेऊन त्यांना बदली जमीन देणार का? बदली जमिनीचा न्याय फक्त आमदार या नात्याने सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनाच आहे का? त्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या संपादनामध्ये आलेल्या जमिनी आपण घेतलेल्या नाहीत. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? असे प्रश्न विचारत राऊतांनी याबाबत तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.