उबाठा गट सांभाळता येत नसलेल्या संजय राऊतांनी मोदींना सल्ले देऊ नयेत; भाजपचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:21 IST2026-03-06T14:19:04+5:302026-03-06T14:21:37+5:30
Sanjay Raut vs BJP: संजय राऊत हे स्वत: सोनिया गांधींच्या हातातील बाहुले झाल्याचीही टीका

उबाठा गट सांभाळता येत नसलेल्या संजय राऊतांनी मोदींना सल्ले देऊ नयेत; भाजपचा घणाघात
Sanjay Raut vs BJP: राज्यात राज्यसभेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांना संधी देण्यात आली. यावरून उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे नाराज असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसे असतानाच, आखाती देशांतील युद्धजन्य स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशी भूमिका घ्यायला हवी याबाबत संजय राऊत यांनी सल्ला दिल्याचे दिसले. अशा लोकांनी मोदींना सल्ले देणे हास्यास्पद आहे. ज्यांना कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक सांभाळता आले नाहीत, रेणापूरमध्ये उबाठाच्या सर्व उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी लागली, ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही; त्यांनी इराण इस्राईल युद्धासंदर्भात फुकाच्या गप्पा मारून पंतप्रधान मोदी यांना सल्ले देऊ नयेत, अशी खरमरीत टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"देशसुरक्षा आणि हित साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम असून वेळोवेळी राष्ट्रहित डोळ्यासमेर ठेवून योग्य भूमिका मांडत आहेत. संजय राऊत हे कमकुवत झालेल्या उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून पक्ष वाचवण्यासाठी काम न करता, आता विश्वप्रवक्ते असल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय अभ्यासक असल्याचा आव आणत आहेत. भारताचे मीठ खायचे आणि इतर देशांचे गुणगान गायचा धंदा राऊतांनी सुरू केला असून ते देशाची बदनामी करत आहेत. त्यांना इतकाच कळवळा असेल तर गाझा पट्टीमध्ये जाऊन युद्ध लढावे," असा टोला त्यांनी लगावला.
"उबाठा गट ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला आहे, त्या काँग्रेसने देशाला गुलामगीरीच्या दरीत लोटले होते हा इतिहास जरा राऊतांनी वाचावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १४० कोटी जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. भारत अमेरिका करारात देखील राष्ट्रहित, जनहित साधण्याचा प्रयत्न झाला असून पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळेच भारताची अर्थव्यवस्था आज चौथ्या क्रमांकावर पोहोचली," ही बाब बन यांनी अधोरेखित केली.
"उबाठा गट, राऊतांना महाराष्ट्रातील मतदारांनी तीन वेळा नाकारून उबाठा गटाची लायकी काय हे दाखवून दिले आहे. देशावर थुंकण्याची भाषा राऊतांना शोभत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थुंकण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. राऊतांनी मराठी शब्दांच्या अचूक अर्थाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. साध्या सोप्या कठपुतळी शब्दाचा अर्थही राऊतांना माहित नसल्याने तो अर्थ समजावून सांगावा लागेल. मोदी सरकारवर 'अमेरिकेची कठपुतळी' अशी टीका करणारे राऊत स्वत: सोनिया गांधींच्या हातातील बाहुले आहेत, शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारी कठपुतळी आहेत," असा हल्लाबोल त्यांनी केला.