आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दिसले; संजय राऊतांनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:47 IST2026-03-30T11:44:11+5:302026-03-30T11:47:24+5:30
Sanjay Raut News: जर एकनाथ शिंदे यांनी बोलावले तर जाल का?, या प्रश्नावर संजय राऊत यांनी सूचक विधान केले.

आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दिसले; संजय राऊतांनी सगळे सांगितले
Sanjay Raut News: भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेते, सेलिब्रिटींनी मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हेही या कार्यक्रमात दिसले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
सुतावरून स्वर्ग गाठला जात आहे. राजकारण वेगळी गोष्ट आहे, सुख-दु:ख वेगळी गोष्ट आहे. कंबोज यांच्या मुलीशी आमचे वैर असण्याचे काही कारण नाही. जगात इतक्या उलथापालथी होत असताना त्यावर चर्चा करायचे सोडून आपण यावर का अडलो आहोत? कंबोज यांना आम्ही आधीही विरोध केला, यापुढेही करू. आमचे नेतृत्व आणि आमच्या कुटुंबीयांचे संस्कार चांगले आहेत. युद्धशास्त्रात कुटुंबीयांना कधीही मधे आणायचे नसते, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. यानंतर संजय राऊत यांनीही सविस्तर भाष्य केले.
राजकारण करणे योग्य नाही
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोणी एखाद्या शुभकार्याला बोलवले तर तिथे जाणे चुकीचे नाही. तो कौटुंबिक कार्यक्रम होता, तिथे अनेक क्षेत्रांतील लोक उपस्थित होते. आदित्य ठाकरे तिथे थोड्या वेळासाठी गेले होते, असे मी वाचले आहे. अशा मंगल कार्याला कुणी निमंत्रित केले असेल, तर त्यावर राजकारण करणे योग्य नाही. राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल, तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून सहभागी होणे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. तो राजकीय सोहळा नव्हता, त्यामुळे त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. राजकीय संघर्ष कधीही संपत नाही, तो कायम सुरूच राहतो. मात्र, वैयक्तिक संबंध आणि सार्वजनिक जीवनातील शिष्टाचार पाळणे हे वेगळे असते. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याचा अर्थ राजकीय जवळीक असा लावणे चुकीचे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, जर एकनाथ शिंदे यांनी बोलावले तर जाल का?, असा प्रश्न संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आला. नी आधी बोलावू तर द्या. त्यांच्याकडे सध्या कोणतेही शुभ कार्य आहे असे मला वाटत नाही, त्यांची सर्व कार्ये पार पडली आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.