"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:01 IST2025-09-29T17:00:47+5:302025-09-29T17:01:09+5:30
Congress News: राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार हा संघाच्या काळ्या टोपीचा विचार असून, राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या झाडण्याची धमकी भाजपाच्या एका प्रवक्त्याने दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता याविरोधात काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार हा संघाच्या काळ्या टोपीचा विचार असून, राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका प्रवक्त्याने छातीत गोळ्या घालण्याची जाहीर धमकी दिली आहे त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या छातीत गोळ्या घालणारी औलाद अजून जिवंत असून हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या टोपीतून आला आहे परंतु राहुल गांधींच्या केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सकाळी ६ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्यागग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, सुनिल केदार, अनिस अहमद, राजेंद्र मुळक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्व भारतीयांनी काम करावे आणि संविधानाचे सत्य सर्वदूर पसारावे हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी म्हटले.