मुंबई - महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले? त्यांनी कोणते फंडे वापरले? पक्ष कसे फोडले? चुकीचे निकाल कसे दिले ? हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेमध्ये झालेला राडा, आमदार निवासातील भांडण आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीड मधील निरापराध सरपंचाला ज्या पद्धतीने मारले गेले. ते मानवतेला लाज वाटणारे आहे. एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. एक आमदार कॅन्टीन मधील वेटरला मारहाण करत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गुंडांनी मारहाण केली ते गुंड भाजपचे पदाधिकारी आहेत.
एखाद्या समाजाला विरोध करायचा, वडीलधाऱ्यांना काहीही बोलायचे अशी भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना मुभा दिलेली आहे. एक प्रकारे राज्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, किती पक्ष फोडले, कसे चुकीचे निकाल दिले हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात नियंत्रण नाहीत. गुंड फोफावले आहेत. दहशत निर्माण झाली आहे. आणि ही दहशत भाजप पुरस्कृत असून राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्या पक्षाला हे लाजिरवाने आहे.
मी चाळीस वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम केले अशी संस्कृती कधीही नव्हती .वादविवाद असतात परंतु त्यानंतर चहापानासाठी एकत्र यायचे. परंतु सध्या गुंड विधानसभेत येत आहेत. मारहाण करतात. त्या गुंडांना संरक्षण दिले जाते आहे. मारहाण करणाऱ्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला मात्र शिक्षा हा काय प्रकार आहे. हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे. विधानसभेमध्ये झालेला राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याचबरोबर प्रवीण गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर आणि संत परंपरांचे विचार समतेचे व बहुजनांचे विचार सांगत आहेत. हा विचार काही कडवट लोकांना सहन झाला नाही. आणि त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला आहे हा काटे कोण आहे. तो गुंड आहे आणि तो पदाधिकारी आहे. त्याला पद दिले जात आहे .या काटे मागचे खरे सूत्रधार शोधले पाहिजे. असे काटे जनतेने मोडून काढले पाहिजे. अशा प्रसंगी जनतेने अधिक संवेदनशील होऊन जागृत झाले पाहिजे. सरकार विरोधात आवाज उठवला पाहिजे आम्ही तर लढणारच आहोत परंतु जनतेनेही याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
महायुती सरकार अनेक खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे अमिष दाखवले. मात्र पंधराशे वेळेवर दिले जात नाही . अनेक लाडक्या बहिणींची नावे दररोज कमी केली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेतकरी अडचणीत आहे खरे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र आता सरकार याबाबत बोलत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे असेही ते म्हणाले.
तर निळवंडे कालव्याबाबत बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की धरण व कालवे आपण दुष्काळी जनतेसाठी निर्माण केले. यावर्षी मी आणि जून मध्ये चांगला पाऊस झाला ओहर फ्लो चे पाणी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी आपण शासनाला पत्र दिले. आता उर्वरित वितरिकांची कामे लवकर व्हावी व या पाण्यापासून उपेक्षित जो शेतकरी आहे त्याला पाणी मिळावे अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.