Raj Thackeray: "माझ्याकडे निशाणी, नाव असलं काय - नसलं काय; मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचाय!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:43 IST2022-08-23T14:42:53+5:302022-08-23T14:43:28+5:30
Raj Thackeray News: आता राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून उद्धव ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो, मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: "माझ्याकडे निशाणी, नाव असलं काय - नसलं काय; मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचाय!"
मुंबई - शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाचा यावरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात कोर्टकचेरीपासून रस्त्यावरही संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आता राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून उद्धव ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो, मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, आज महापुरुषांचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जात आहे. वारसा हा वास्तूचा नसतो तर वासरा हा विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे यावरून काही होत नसतं. विचारांचा वारसा पुढे चालवावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला त्या विचारांची पताका पेशव्यांनी अटक किल्ल्यापर्यंत फडकवली. महाराजांचा विचार पोहोचवला कुणी तर पेशव्यांनी. पेशव्यांच्या हातात संपूर्ण सत्ता होती. मात्र त्यांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणवून घेतले नाही. छत्रपती तेच आम्ही त्यांचे नोकर, असे पेशवे सांगत. माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, जी गोष्ट आहे ती पुढे नेण्याची गरज आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय आणि नसलं काय. याने काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट असेल तर ती म्हणजे विचार. बाकीचं सोडा त्याबाबतीत मी श्रीमंत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी, महापुरुषांनी जे विचार पेरलेत ते वाचणं, ऐकणं, बोध घेणं, महाराष्ट्र समजून घेणं, या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत. तर या गोष्टी टिकतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.