आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:05 IST2024-08-24T14:04:54+5:302024-08-24T14:05:29+5:30
Raj Thackeray PC News: वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यासाठी मनसेने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली
Raj Thackeray PC News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा मानस आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघांचा आढावा घेऊन उमेदवारही जाहीर केले. यावेळी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे उमेदवार देणार का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
बदलापूरचे प्रकरण दुर्दैवी आहे. अशा लोकांना ठेचलच पाहिजे. शासन कठोर होत नाही. त्यामुळे हे प्रकार होतात. निर्भया प्रकरणातील नराधमांना किती वर्षांनी फाशी झाली, असा मुद्दा उपस्थित करत, मनोज जरांगे उपोषण करत आंदोलनाला बसले होते. तिथे लाठीचार्ज झाला. त्यानंतर पोलिसांवरच कारवाई झाली. लाठीचार्ज करावा, हे पोलिसांना सुचले का? कारवाई केल्यावर ते प्रकरण आपल्याच अंगलट येणार असेल, तर पोलीसही ठाम भूमिका घेऊ शकणार नाहीत, असेच दिसले. अशा वेळेस राज्य सरकारने पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. हाच धागा पकडत पत्रकारांनी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार का, असा प्रश्न विचारला. यावर बोलताना, मी निवडणूक लढवणार आहे. मागच्या वेळेस एकदा जी गोष्ट केली, त्या मतदारसंघात साधारणपणे आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कशी होईल, असे सांगत राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले.
दरम्यान, राज्यातील जनता एक दिवस हातात राज्य देईल. कारण १९५२ सालापासून भाजपा असेच आवाहन देशातील जनतेला करत आला आहे. तेव्हा जनसंघ होता. २०१४ मध्ये भाजपाला सत्ता मिळाली. वेळा लागतो, असा आशावाद राज ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. जातीचे विष पवारांनी कालवले. संतांची आडनावे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ लागली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.