Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:41 IST2025-06-15T12:38:38+5:302025-06-15T12:41:43+5:30
Maharashtra Lightning News: राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून दोन सख्ख्या भावांसह चारजणांचा मृत्यू झाला असून ७ जण भाजले आहेत.
यश राजू काकडे (वय १४), रोहित राजू काकडे (२१, रा. सारोळा), रंजना बापूराव शिंदे (५०, रा. मोंढा बु.) व शिवराज सतीश गव्हाणे (३१, रा. पिंपळदरी) अशी मयतांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील पिंप्राळा येथे वीज पडून माणिक महादराव मिरासे (४७) यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील ताजापुरी नथ्थू हरचंद सनेर (६३) तर जळगाव जिल्ह्यात मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) व शांताराम शंकर कठोरे (४४, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. तुरखेड (जि. अमरावती)येथील पवन कोल्हे (२५) हा मरण पावला.
राजापुरात ढगफुटीसदृश पाऊस
राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यात शुक्रवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला असून, तालुक्यातील प्रसिद्ध आडिवरे येथील श्रीदेवी महाकाली मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. तब्बल ३७ वर्षांनंतर मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
रत्नागिरीला रेड अलर्ट; मुंबईला यलो अलर्ट
मुंबई : मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे. पावसाचा हा ट्रेंड असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून आणि मुंबईला येलो अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा अंदाज कायम आहे.
४० वर्षांत प्रथमच जूनमध्येच भरले सीना धरण
सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच भरले असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी जूनमध्येच धरण भरले आहे. सीना धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. २.४० टीएमसी क्षमता असलेल्या सीना धरणातून दुपारी १२ वाजता २२० क्युसेक वेगाने नदी पात्रात विसर्ग सोडल्याची माहिती सीना धरणाचे सहायक अभियंता संभाजी पवार यांनी दिली. कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायी ठरणारे सीना धरण भरल्याने शेतकरी सुखावला आहे.