अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 14:30 IST2020-03-14T14:28:55+5:302020-03-14T14:30:56+5:30
एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर
मुंबई : एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गोगलगाय करून टाकलं असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. औरंगाबाद येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने एनआरसी,एनपीए, सीएएच्या विरोधात भटक्या विमुक्त आदिवासी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकत्व कायद्यावरून आंबेडकर यांनी यावेळी केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला. या देशात राहण्यासाठी तुम्हाला हे सिद्ध करावे लागणार आहे की, तुमचा जन्म या देशात झाला आहे. त्यासाठी तुमच्या जन्म नोंदीचा दाखला द्यावा लागणार आहे. जर तो नसेल तर तुमच्या आई-वडील किंवा आजोबांचा जन्म दाखला दाखवा लागणार आहे. ते कुठून आणणार. तर एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.
मोदींचा जन्म भारतात झाला असल्याने त्यांना नागरिकत्व देण्यात आला असल्याचं माहिती अधिकारातून समोर आले आहे. मग आमचा जन्म काय पाकिस्तान मध्ये झाला का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांनी सोनिया गांधींना गोगलगाय करून ठेवलं असून, काँग्रेस पक्षाचं अस्तीत्वचं संपून टाकलं आहे. त्यामुळे ही लढाई आपल्यालाच लढावी लागणार, असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.