निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:15 IST2025-06-08T07:14:59+5:302025-06-08T07:15:41+5:30
Corruption: पहिल्यांदा मालाचा पुरवठा, नंतर पुरवठ्यासाठीचे पत्र आणि त्यानंतर पुरवठ्याचा आदेश असा उलटा कारभार करणारे कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले, यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
कोल्हापूर /अमरावती/जळगाव - पहिल्यांदा मालाचा पुरवठा, नंतर पुरवठ्यासाठीचे पत्र आणि त्यानंतर पुरवठ्याचा आदेश असा उलटा कारभार करणारे कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले, यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
निकृष्ट बदाम, बुरशीयुक्त पिस्ता आणि कुरतडलेल्या चपला आणि इतरही निकृष्ट वस्तू पुरवत राज्यभरातील कारागृहांमध्ये ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. यातील प्रमुख पुरवठादार जळगावचे सुनील झंवर या घोटाळ्यात सामील होते.
माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले, गरज नसताना जनरेटर, वॉशिंग मशिन्सची खरेदी, ३४चा गहू ४४ रुपये प्रतिकिलो, ४०चा तांदूळ ५४ रुपये प्रतिकिलो, १९५ची डाळ २१५ रुपयांना विकत घेत हा सर्व घोटाळा करण्यात आला. छाेट्या पुरवठादारांना बाजूला काढण्यासाठी १०० कोटींच्या उलाढालीची निविदेत अट घालण्यात आली. निकृष्ट वस्तू असल्याचे अनेक कारागृह अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळवले होते, असा दावा शेट्टी यांनी केला. मी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे घेऊन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दोनवेळा भेटलो. एका महिन्यात चौकशीचे आश्वासन त्यांनी दिले होते. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतल्याचे दोन ओळींचे पत्रही मला कोणी पाठवलेले नाही, असे शेट्टी म्हणाले.
अमरावतीतील सुपेकरांची लुडबुडही आली चर्चेत
पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले सध्याचे कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कारभार असताना १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहात ‘अनऑफिशियल’ भेट दिली होती.
कारागृहात बंदिस्त असलेल्या पुण्यातील हाय प्रोफाइल गायकवाड बाप-लेकांना तुरुंगाधिकाऱ्यांसमक्ष टार्गेट केले होते. पत्नीच्या छळप्रकरणी पुणे येथील गणेश गायकवाड, त्यांचे वडील नानासाहेब गायकवाड येरवडा कारागृहात बंदिस्त होते. मात्र, या बाप-लेकांची अचानक अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
या निर्णयाची चौकशी केल्यास मोठा ‘फ्रॉड’ बाहेर येऊ शकतो, असे बोलले जात आहे. सुपेकरांनी तेव्हा अमरावतीत आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. गायकवाड पितापुत्र यांना त्रास देण्याविषयी तुरुंग प्रशासनाला सुपेकरांनी मौखिक आदेश दिले. ही जबाबदारी पार न पाडणाऱ्या सातजणांचे २०२४ मध्ये निलंबन केले.
आराेग्यविषयक अहवाल समाधानकारक नसल्याचा ठपका
ठेवत २० मार्च २०२४ रोजी माझे निलंबन केले होते. मात्र, त्यानंतर आयपीएस जालिंदर सुपेकर यांना ही चूक लक्षात येताच पुन्हा तीन महिन्यांनी अमरावतीतच रुजू करून घेतले. मला कोणतीही ‘डिमांड’ केली नव्हती.
- डॉ. प्रमोद रोजतकर,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नांदुरा
सुपेकरांनी अमरावती कारागृहात गायकवाड बाप-लेकांशी भेट घेतली तेव्हा साडेतीन तास अंडा बराकमध्ये काय केले होते, हे समोर आले पाहिजे.
- ॲड. निवृत्ती कराड, पुणे
चाैकशीसाठी तयार
माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने केलेले आहेत. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. शेट्टी यांच्या जवळच्या माणसाला कंत्राट मिळाले नाही म्हणून ते आरोप करत आहेत.
- सुनील झंवर, संचालक,
साई मार्केटिंग कंपनी
२०२४ मध्ये करण्यात आलेल्या निलंबनात अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिरासे, तुरुंगाधिकारी राजेंद्र राठोड, वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ. प्रमोद राजतकर, हवालदार उल्हास साखरे, महिला शिपाई सरिता सरोदे, प्रतिनियुक्तीच्या तुरुंगाधिकारी संघमित्रा शेळके यांचा निलंबनात समावेश होता.