“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:01 IST2026-03-12T16:57:30+5:302026-03-12T17:01:21+5:30
Eknath Shinde Criticize Rahul Gandhi: देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. तसेच देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला
मुंबई - सध्या देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईपासून ते इतर मुद्द्यांपर्यंत सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. तसेच देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकार अत्यंत बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार आणि खरमरीत शब्दात टीका केली.
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय तणावामुळे देशातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, संसद सुरू असताना राहुल गांधी नेहमी परदेश दौऱ्यावर असतात. देशाच्या संसदेत चर्चा करण्याऐवजी ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचे काम करतात. प्रत्येक वेळी संसद अधिवेशनाच्या काळात दुसऱ्या देशात जाऊन भारताविरोधात बोलण्याची त्यांची सवयच झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
“देशात ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवाया होत असताना आपल्या जवानांनी आणि सुरक्षादलांनी केलेल्या पराक्रमाबद्दल राहुल गांधींना दुःख किंवा अभिमान काहीच वाटत नाही. उलट देशाची प्रतिमा खराब करणारी वक्तव्ये करून पाकिस्तानसारख्या देशांना मथळे मिळवून देण्याचे काम ते करत आहेत,” असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. देश वेगाने प्रगती करत असताना काही लोकांना त्याचा “पोटदुखी” होत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.
देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल. देशात राहून देशासाठी काम करा, अशी बोचरी टीका शिंदे यांनी यावेळी केली.