राज्यासमोर नवं संकट! १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:25 IST2026-02-01T14:25:00+5:302026-02-01T14:25:00+5:30
Raigad Climate Action Plan: गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता चक्क ४ पटीने वाढली आहे. हे केवळ निसर्गाचे बदल नसून मानवासाठी धोक्याची घंटा आहे. हे संकट रोखण्यासाठी रायगड जिल्हा आता स्वतःचा 'क्लायमेट ॲक्शन प्लॅन' तयार करणार आहे.

राज्यासमोर नवं संकट! १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेल्या ५० वर्षात उष्णतेचे दिवस, दुष्काळाची तीव्रता आणि पूरस्थिती चौपट पटीने वाढली आहे. कोकण विभागामध्ये (रायगडसह) पूर, समुद्र पातळीतील वाढ, मॅन्ग्रोव्ह आणि जैवविविधतेचा -हास, आरोग्य धोके (जसे लेप्टोस्पायरोसिस) वाढत आहेत. त्यामुळे निसर्गचक्र बिघडले असून, हे वातावरणीय बदलाचे परिणाम आहेत, असे महाराष्ट्राच्या वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी स्पष्ट केले.
निर्धारित वातावरणीय बदलाचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम रायगड जिल्हा 'क्लायमेट अॅक्शन प्लॅन' तयार करणार असल्याची घोषणा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो, असर सोशल इम्पॅक्ट अॅडवायसर व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅशनल सेमिनार ऑन लोकलायझिंग जेंडर क्लायमेट अॅक्शन' कार्यक्रमात अभिजीत घोरपडे आणि किशन जावळे बोलत होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रकल्प संचालक प्रा. मंजुळा भारती म्हणाल्या, प्रवाहाबाहेर ढकलल्या गेलेल्या लोकसमुदायांना केंद्रस्थानी आणून आम्ही वातावरण बदलाच्या शासन व्यवस्थेची नव्याने मांडणी करत आहोत.
काय आहे अॅक्शन प्लॅन?
क्लायमेट अॅक्शन प्लॅन म्हणजे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तयार केलेली एक सुनियोजित कृती योजना आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबईसह अनेक शहरांमध्ये (नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर) यासाठी आराखडे तयार केले आहेत.
१० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट
वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले, सध्या जगभरात १० लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. येत्या काही वर्षात उरलीसुरली जैवविविधता वाचवणे गरजेचे आहे. जगभरात वाढत्या तापमान वाढीच्या संकटाबद्दल उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकरिता वातावरणीय बदलाचे कृतिशील सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे म्हणाल्या, आदिवासी संस्कृती ही पर्यावरण केंद्रित आहे आणि आदिवासी समुदायाचे बळकटीकरण करणे आणि त्यांना शाश्वत निसर्गकेंद्री रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या क्लायमेट अॅक्शन प्लॅनचे थोरण असेल. तसेच सामूहिक वन व्यवस्थापन या कृतीचा प्रभावी उपयोग या वातावरणीय कृती आराखड्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या कृती आराखड्यामुळे वातावरणीय बदलाचे परिणाम समजण्यास सोपे जाईल आणि त्यानुसार उपाय करता येतील.