भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:39 IST2025-06-18T17:37:25+5:302025-06-18T17:39:36+5:30
NCP SP Group Jayant Patil News: सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वाची मागणीही केली आहे.

भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
NCP SP Group Jayant Patil News: १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासन एक वर्षापर्यंत किंवा २०० यात्रा यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यानंतर या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
फास्टॅग आधारित वार्षिक पास केवळ गैर व्यावसायिक खासगी वाहने (कार-जीप-व्हॅन आदी) यासाठी विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर तो चालणार आहे. या पाससाठी लवकरच महामार्ग ॲप आणि एनएचआच्या संकेतस्थळावर एक स्वतत्र लिंक उपलब्ध केली जाणर आहे. ज्यामुळे पास उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंतीही केली आहे.
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी तीन हजार रुपयांच्या वार्षिक पासची घोषणा केली असून, आम्ही त्याचे स्वागत करतो. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वरूनही मोठ्या प्रमाणावर दैनंदिन पातळीवर लोक प्रवास करतात. या प्रवासासाठी देखील वार्षिक पासची मोठी आवश्यकता आहे. म्हणूनच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी याच धर्तीवर पुणे-मुंबई एक्सप्रेसवे अटल सेतूसह वार्षिक पासची घोषणा करून दैनंदिन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, टोल नाक्यावर होणारा विलंब कमी होईल. नाक्यावर होणारी वाहनांची गर्दीही कमी होईल तसेच विविध कारणांमुळे नाक्यांवर होणारे वादही कमी होतील, असा विश्वास नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या योजनेमुळे वाहन धारकांची वर्षाला १० हजार रुपयांची बचत होईल, असा दावा गडकरी यांनी केला.
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी तीन हजार रुपयांच्या वार्षिक पासची घोषणा केली असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वरूनही मोठ्या प्रमाणावर दैनंदिन पातळीवर लोक प्रवास करतात. या प्रवासासाठी देखील वार्षिक पासची मोठी आवश्यकता आहे.…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 18, 2025