“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:52 IST2025-06-18T20:52:38+5:302025-06-18T20:52:38+5:30
NCP SP Group Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात.

“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
NCP SP Group Jayant Patil News: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून महायुतीतील घटक पक्षात विरोधी पक्षांचे नेते सामील होत आहेत. सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश केला. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याही भाजपा प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयंत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मी इथेच आहे, पक्षाचा मेळावा घेत आहे. तुम्ही असे का करता मला माहिती नाही. भाजपा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला गरिबाला का सारखे वेठीस धरता. माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते भेटू शकत नाहीत का? हे सर्व थांबवा. तुम्ही पक्षांतरासाठीच भेटलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बातमी चालवता मलाही प्रसिद्धी मिळते, माझीही कामे होतात, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले
जयश्रीताई पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, जयंत पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते वसंतदादांपर्यंत या कृष्णाकाठची माणसे विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होते. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले, यावर मी बोलणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी पूर येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पूर येऊ नये, यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्य वेळी पाणी सोडले पाहिजे. योग्य नियोजन केले पाहिजे. अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे, त्या भागातील लोकांनी जी मते मांडले आहेत, आंदोलने केली आहेत, अशा लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजे. परंतु, सरकारने जे आंदोलनात सहभागी नव्हते, त्यांना बोलावले आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.