"भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 06:33 PM2021-02-24T18:33:26+5:302021-02-24T19:00:24+5:30

Nawab Malik And Modi Government : मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. यावरून देखील नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

NCP Nawab Malik Slams BJP And Modi Government Over Narendra Modi Stadium | "भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय"

"भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय"

Next

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील कोरोना चाचणीची संख्या वाढवली पाहिजे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यायला हवा अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. तसेच वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे देखील या बैठकीला उपस्थित होते. "राठोड हे मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते, ते शासकीय कामकाज पुढे ठेवतील. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही" असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे. 

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. यावरून देखील नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार कोणतीही नावं बदलत आहेत. भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला आहे. 

शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही -  नवाब मलिक

"नरेंद्र मोदींच्या नावाने ज्या स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे त्याचं नाव आधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने होतं. भारतरत्नाच्या नावाचा असा बदल करणं हे कुठेतरी सर्व भारतरत्नांचा अपमान केल्यासारखं आहे. हे अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हा निर्णय सहन करणार नाही" असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच मलिक यांनी "पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही. शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही. पोहरादेवी गडावर कोणामुळे गर्दी जमली? याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. कोरोना काळात अशाप्रकारे गर्दी जमवणं योग्य नाही, लोकांना कोणी आवाहन केले होते का? याचीही चौकशी होईल, अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील" असं देखील म्हटलं आहे. 

 

Web Title: NCP Nawab Malik Slams BJP And Modi Government Over Narendra Modi Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.