Maharashtra Politics: “अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतं”; सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 17:43 IST2023-01-07T17:42:17+5:302023-01-07T17:43:40+5:30
Maharashtra News: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप-शिंदे गटावर टीका केली.

Maharashtra Politics: “अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतं”; सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने आक्रमक होत अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलनेही केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांची पाठराखणही केली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही भाष्य केले. बेळगाव प्रश्नावर अमित शाह यांच्यासोबत महाविकास आघाडीतील खासदाराची बैठक झाली. त्याबद्दल मी अमित शाह यांचे आभार मानते. त्यावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून चर्चा केली. याप्रकरणी कोणी काही बोलणार नाही. न्यायप्रविष्ट बाब असल्याच अमित शाह यांनी त्यावेळी सांगितले होते. तरीदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत विधान करीत आहेत. ऐरवी आपले ईडी सरकार सतत बोलत राहतात. पण यावर काही बोलण्यास तयार नसून दोघे जण बोटचेपी भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असून कोणीही याव आणि महाराष्ट्राला टपली मारून जावे. आम्ही हे कधीच सहन करणार नाही. या कृतीतून महाराष्ट्राच महत्व कमी करण्याच काम अदृश्य हात करीत आहेत, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखे मला वाटते
यावेळी बोलताना अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखे मला वाटते, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतेय, हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. माझी सर्वांना विनंती आहे. आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजेत. अनेक महिन्यांपासून मी पाहत आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांवर होत आहेत. अनेक आठवडे संधी मिळते तिथे सांगतेय हे थांबवा. माझ्या पक्षापासून सुरुवात करते की हे थांबवू. देवेंद्र फडणवी यांनी पुढाकार घेऊन गलिच्छ राजकारण थांबवावे. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार टीका केली आहे. यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याचे सांगितले. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"