"ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं 'ते' दिल्ली कशी जिंकून देणार"; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:21 IST2020-02-06T12:21:03+5:302020-02-06T12:21:42+5:30

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची फौज भाजपने दिल्लीला बोलवली आहे.

NCP criticizes BJP over Delhi assembly elections | "ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं 'ते' दिल्ली कशी जिंकून देणार"; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

"ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं 'ते' दिल्ली कशी जिंकून देणार"; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असून, राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत ठाण मांडून आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात चाललं नाही 'ते' दिल्लीत काय चालणार, असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता जेमतेम एक दिवस उरला आहे. दिल्लीच्या जनतेने भाजपाला साफ नाकारल्याचेच अनेक सर्वेक्षणांमधून समोर आलेय. त्यामुळे भाजपाने दिल्ली निवडणुकीचा प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत आहे. यामुळे भाजपाने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची फौज भाजपने दिल्लीला बोलवली आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अमित शहा स्वतः या सभांना संबोधित करणार आहेत. भाजपा दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचं प्रचार कार्ड वापरत आहे. पण ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं ते दिल्ली कशी जिंकून देणार हा प्रश्नच असल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला.

Web Title: NCP criticizes BJP over Delhi assembly elections