“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:29 IST2026-02-19T17:28:33+5:302026-02-19T17:29:45+5:30
NCP Ajit Pawar Group News: राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका?
NCP Ajit Pawar Group News: आम्हीदेखील आमचे दैवत गमावले आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे 'दादा' आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय, एकमेकांना धीर देतोय, पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.
शरदचंद्र पवार गटाकडून वारंवार विलिनीकरणाची वक्तव्य येत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या 'माझा दादा गेला' त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या आता गौण आहेत, असे बोलत आहेत. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे हे पडद्याआडून सातत्याने विलीनीकरणाचा मुद्दा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणारे वातावरण करत आहेत असाही थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला.
सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे
आमचे दैवत अजित पवार यांचा विमान अपघातात दूर्देवी मृत्यू झाला, याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. विमान अपघातासाठी जबाबदार असलेली व्हीएसआर कंपनी असेल, पायलट किंवा ट्रॅक रेकॉर्ड असेल या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले.
विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही
विलीनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही. सध्या आमच्यासमोर आमचे दैवत गेल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि ताकदीने त्यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणे आणि दादांचे जे व्हिजन होते त्या व्हिजनवर आमचे आमदार महायुतीमध्ये काम करतील ही प्राथमिकता आहे. त्यामुळे कायम पडद्यामागून वक्तव्य करून राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करू नये असा मोलाचा सल्ला आनंद परांजपे यांनी शरद पवार गटाला दिला आहे.
दरम्यान, केंद्रीय उड्डाणमंत्री के रामा नायडू व मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे चौकशी सुरू केली असून ब्लॅकबॉक्सचा डेटा रिकव्हर होणारच. सुप्रिया सुळे यांनी ब्लॅकबॉक्सचा डेटा जात नाही तो रिकव्हर होतो, असे वक्तव्य पुण्यात केले आहे. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लॅकबॉक्स आगीत न जळता तो राजकीय आगीत गेला अशाप्रकारे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले याबद्दलही नाराजी आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.