“...अन्यथा भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु”; NCPचा राऊतांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:46 IST2025-04-04T16:44:27+5:302025-04-04T16:46:38+5:30
NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: दररोज पक्ष सोडून जे जात आहेत, त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे, तो अधिक बळकट कसा होईल, याचा संजय राऊतांनी विचार करावा, असा पलटवार करण्यात आला आहे.

“...अन्यथा भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये 'बेड' बुक करु”; NCPचा राऊतांवर निशाणा
NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेतील चर्चेवेळी राष्ट्रवादीचे काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी, संजय राऊतांनी रंग बदलू नये, असा टोमणा मारला. प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. इतिहास काढला तर प्रफुल्ल पटेलांना महाराष्ट्र सोडून जायला लागेल, असे संजय राऊत म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या नेत्यांनी संजय राऊतांनी पलटवार करताना निशाणा साधला आहे.
भांडुपचा भोंगा दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे, नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करू, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचे जाज्वल्य हिंदूत्व जे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होते, याची आठवण करून दिली आणि त्या भाषणाच्या मिरच्या इतक्या झोंबल्या की, हा भोंगा दिल्लीवरून कर्कश आणि खालच्या पातळीवर येऊन वाजला, या शब्दांत आनंद परांजपे यांनी हल्लाबोल केला.
आताची शिवसेना संजय राऊतांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या चरणी अर्पण केली
शिवसेनेचे हिंदूत्व हे 'गर्व से कहो हम हिंदू है...' आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते आणि ज्यावेळी ९२-९३ मध्ये दंगली झाल्या त्यावेळी शिवसेनेच्या असलेल्या सहभागाबद्दल आठवण करून दिल्यानंतर केवळ आताची शिवसेना जी संजय राऊत यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या चरणी अर्पण केली आहे. ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही बोलू शकतो. मग संजय राऊत यांना काँग्रेसचे सर्टिफाईड 'डॅशडॅशडॅश' किंवा सिल्व्हर ओकचे सर्टिफाईड 'डॅशडॅशडॅश' हे आम्ही बोलू शकतो. परंतु आमच्यावर ते संस्कार नाहीत. लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल ज्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहात शिवसेनेची भाषणे झाली. परंतु, ही निराशेच्या व पराभवाच्या वैफल्यातून झाली. दररोज पक्ष सोडून जे शिवसैनिक जात आहेत, त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे, तो अधिक बळकट कसा होईल, याचा संजय राऊत यांनी विचार केला तर ते अधिक योग्य राहील, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.
दरम्यान, पत्राचाळीची लॉटरी निघत आहे आणि ज्यांना या आरोपात ईडीची ८-९ महिने जेलवारी झाली आहे त्या संजय राऊत यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरोप करणे खूप सोपे आहे. खासदार प्रफुल पटेल यांची साधी चौकशीही कधी लागली नाही. स्वतः संजय राऊत हे ईडीच्या जेलची वारी करुन आले आहेत. सध्या ते जामीनावर आहेत. त्यांनी उगाच वायफळ आरोप करु नये असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.