राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:36 IST2026-01-05T17:35:43+5:302026-01-05T17:36:24+5:30
Narayan Rane Retirement Clarification: कधीतरी थांबायला हवं असे राणे म्हणल्याने रंगल्या निवृत्तीच्या चर्चा

राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
Narayan Rane Retirement Clarification: शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा अशा तीन बड्या पक्षाच्या माध्यमातून राजकारण करणारे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे निवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. सिंधुदूर्गातील एका सभेमध्ये बोलताना त्यांनी जी विधाने केली, त्यावरून नारायण राणे आता राजकारणातून संन्यास घेणार असा अंदाज लावला जात आहे. "माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करता. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. कधीतरी थांबायला पाहिजे," असे विधान त्यांनी केले. या विधानानंतर रंगलेल्या चर्चांवर अखेर खुद्द नारायण राणे यांनीच स्पष्टीकरण दिले.
निवृत्त होतो असं म्हणालो नाही!
"निवृत्तीचे संकेत कुणी दिले? असं मी काहीही बोललो नाही. माझं वाक्य नीट ऐका. मी जर लोकांचा रिझल्ट देऊ शकलो नाही, तर माझ्या या पदांचा उपयोग काय? मग मी विचार करेन असं माझं वाक्य होतं. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम असं मी म्हणालो होतो. निवृत्त होतो असं मी म्हणालो नाही," अशा शब्दांत नारायण राणे यांनी निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या.
नारायण राणे भाषणात काय म्हणाले होते?
"मी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळीच मी म्हटलं होतं की, माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष असेल. त्यामुळे पक्षबदल वगैरे चर्चा करण्याची काही गरज नाही. परंतु माझा एक स्वभाव आहे. जगेन तर स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाही. पण एवढी पदे मला मिळाली आहेत. त्याचा लोकांसाठी उपयोग करणे गरजेचे आहे. मी पदाची अपेक्षा करत नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी मी जे.पी. नड्डा यांची वेळ मागितली आणि त्यांना भेटायला गेलो. तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला व्यवसाय करायचा आहे असं मी त्यांना सांगितले. त्यावर राणेजी, तुम्ही राजकारणातून बाहेर जाऊ नका, आम्ही तुम्हाला तसे करू देणार नाही, असे ते म्हणाले होते. पण मी म्हटले होते की, माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करताय. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. मी कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रीय झाल्याने व्यवसायही पाहायला पाहिजे," असे राणे भाषणाच्या वेळी म्हणाले होते.