Nana Patole vs Mahayuti Government : सध्या राज्यातील काही जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातून सुरुवात झालेल्या या आजाराने नागपूर पाठोपाठ सोलापुरात प्रवेश केला आहे. सोलापुरात या आजाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसार माध्यमातून आली आहे. राज्यात १०० पेक्षा जास्त रुग्णांना या रोगाची लागण झाली असून १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. आजाराची व्याप्ती वाढत असताना राज्याचा आरोग्य विभाग आहे कुठे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
"या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत. योग्य ती खबरदारी घेऊन जनजागृती करावी. राज्य सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लावून या रोगाचा प्रसार होऊ नये यावर भर दिला पाहिजे. दुषित पाणी व अस्वच्छतेमुळे हा आजार होत असल्याचे समजते. ११ वर्षापासून ‘हर घर नल, हर नल में जल’ तसेच ‘स्वच्छता मोहीम’ राबवली जात असतानाही स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात, असे म्हणावे लागेल", असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा!
"विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करावी," अशी मागणी पटोले यांनी केली.
"एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे, पण महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही, शिवशाही नावाने सुरु केलेल्या बससेचीही दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला रहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे," असे ते म्हणाले.
"ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहित नसणाऱ्या मंत्री महोदयांना एसटी महामंडळाची राज्यातील १३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे. एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे, हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही" अशी टीका त्यांनी केली.