मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 07:05 IST2018-07-22T02:26:19+5:302018-07-22T07:05:48+5:30
पैठण शहर व तालुक्याची झालेली दुरवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

मुर्दाड लोकांचे नेतृत्व करणार नाही : राज ठाकरे
पैठण (जि. औरंगाबाद) : पैठणच्या अधोगतीस आमदार -खासदारांना मी जबाबदार धरणार नाही; तर अशा निष्क्रिय लोकांना वारंवार तुम्ही निवडून देता म्हणून यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, अशा मुर्दाड लोकांचे नेतृत्व मी करणार नाही, अशा शब्दांत पैठण शहर व तालुक्याची झालेली दुरवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ठाकरे म्हणाले की, तुम्हाला तर आजचा दिवस कसा जाईल, या पलीकडे विचार करण्याची कुवतच नसल्याने असे घडते. अशा मुर्दाड लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरासाठी, तालुक्यासाठी काही करायचे असेल तर मला भेटा. मी मराठवाड्याच्या दौ-यावर आहे, नाही तर कृष्णकुंजवर तुम्ही कधीही भेटू शकता, असे निमंत्रणही त्यांनी युवकांना दिले. राज ठाकरे यांनी जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयास भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आदी उपस्थित होते.