"शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे दिले जातात, पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:34 IST2025-07-02T13:33:07+5:302025-07-02T13:34:17+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? असा सवाल आज काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी यांनी सभागृहात उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.

"शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे दिले जातात, पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल
मुंबई - शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? असा सवाल आज काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी यांनी सभागृहात उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना हे सरकार मदत देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ,कापसाला भाव मिळालेले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील एका 65 वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपलं. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.
अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले, शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत असल्याने सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाचा बहिष्कार केला.