Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:52 IST2025-11-02T12:51:59+5:302025-11-02T12:52:28+5:30
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट केली आहे.

Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, सध्या सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट केली आहे. या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत हा चित्रपट जरूर पाहा असं आवाहन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
"मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही..."
"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."
"आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे."
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे… pic.twitter.com/Xum0x5Gfxz
— Raj Thackeray (@RajThackeray) November 2, 2025
"राज्यातील शेतकरी पार हतबल"
"या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते....याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरू आहे."
"हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का"
"हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पाहा..." असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.