महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आणि आपण मोबाईलमध्ये अडकलोय; राज ठाकरे असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 21:18 IST2026-03-19T21:16:52+5:302026-03-19T21:18:00+5:30
Raj Thackeray Gudi Padwa Melava: दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला.

महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आणि आपण मोबाईलमध्ये अडकलोय; राज ठाकरे असं का म्हणाले?
दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच मोठी जाहीर सभा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सद्यस्थितीवर भाष्य करत राज्यातील तरुणाईला वास्तवाची जाणीव करून दिली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, "आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण राज्य कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. तुम्ही राज्यातील कोणत्याही शहरात जा, तिथे ना कसला आकार उरला आहे ना उकार आहे. शहरांची दुरवस्था झाली आहे."
मुंबईत नव्याने झालेल्या कोस्टल रोडवर बोलताना राज ठाकरे यांनी एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. "कोस्टल रोड बांधला गेलाय खरा, पण तो तुमच्या सोयीसाठी झालेला रस्ता नाही. तो इतरांना मुंबईत सहज येण्यासाठी आणि तुम्हाला मुंबईच्या बाहेर काढण्यासाठीचा मार्ग आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
"आम्ही फक्त मोबाईलवर व्यक्त होतोय!"
राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर बोलताना राज ठाकरेंनी तरुणांच्या मानसिकतेवर प्रहार केला. ते म्हणाले की, "राज्यात शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आपण हे सर्व फक्त पाहतोय आणि केवळ मोबाईलवर व्यक्त होतोय. आपण व्हर्च्युअल जगात अडकलो आहोत." मैदानात उतरून संघर्ष करण्याऐवजी तरुण पिढी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तरुणांचे कान टोचले.