मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:42 IST2025-11-10T13:38:42+5:302025-11-10T13:42:21+5:30
MNS - Maha Vikas Aghadi Alliance: लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. जनतेला सोबत घेऊन महायुतीचा पराभव करणार, असा निर्धार करण्यात आला आहे.

मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
MNS - Maha Vikas Aghadi Alliance: मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी (एकूण २८८) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यातच मनसेच्यामहाविकास आघाडीतील समावेशाबाबत मतभेद असताना नाशिकमध्येमनसे आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. राज्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, नाशिकमध्ये आम्ही मनसेसोबत निवडणुका लढणार असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जातीजातीत भांडण लावण हेच काम सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे माकप नेते डी. एल. कराड यांनी म्हटले आहे.
लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला
संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. देशात राहुल गांधी यांनी मत चोरीवर सरकार आल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबईत एकत्रित मोर्चा झाला. ९६ लाख दुबार मतदार आहेत. शिंदेंच्या सेनेने मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे सांगितले आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे. ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत, असे मनसे नेते दिनकर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सगळी सत्ता आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हजारो घरांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करणार. मतदार यांद्यांमध्ये प्रचंड दोष आहेत. याद्या दुरुस्त झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मतदान पत्रिकेवर मतदान झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे यावेळी सांगण्यात आले.