"भय्याजी जोशींकडून मुंबई आणि मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:21 IST2025-03-06T14:33:14+5:302025-03-06T15:21:17+5:30
Congress Criticize Bhaiyyaji Joshi: मुंबईतील मराठी भाषेलाही कमी लेखून गुजरातीसह इतर भाषा लादण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याच मानसिकतेतून भय्याजी जोशी यांचे वक्तव्य आहे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही.

"भय्याजी जोशींकडून मुंबई आणि मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून, मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा आणि मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अतुल लोंढे म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, परंतु आरएसएसच्या लोकांना मुंबई व मुंबईतील मराठी भाषा, मराठी जनता यांच्याबद्दल कायमच आकस राहिला आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये आणि संस्था, गुंतवणूक मुंबईबाहेर घेऊन जाण्याचा उद्योग भाजपाच्या राज्यात सतत होत आहे. आता मुंबईतील मराठी भाषेलाही कमी लेखून गुजरातीसह इतर भाषा लादण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याच मानसिकतेतून भय्याजी जोशी यांचे वक्तव्य आहे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही.
घाटकोपर हा मुंबईचाच भाग आहे असे असताना घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणण्याचे धाडस जोशी करुच कसे शकतात. घोटकोपरमध्ये लाखो लोक मराठी आहेत व ते मराठीच बोलतात. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने यावर भूमिका जाहीर करावी. भय्याजी जोशी यांचे विधान अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का, त्यांनीही भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी यावेळी केली.