“धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:00 IST2026-02-17T17:58:08+5:302026-02-17T18:00:42+5:30
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

“धनंजय मुंडेंची माझ्याजवळ २२ प्रकरणे, त्यांना मंत्री केल्यास राष्ट्रवादी संपेल”: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil News: आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकवून देऊ नये, माझ्याकडे तुमची खूप प्रकरणे आहेत. मी अजून त्यात हात घातलेला नाही. तुमची लाभार्थी टोळी माझ्याविरोधात कशी लावली, हे चांगले माहिती आहे. तुम्ही बदनामी करत आहात. रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरहून माझ्याकडे आली होती. त्यांनी सांगितलेले एवढे भयानक प्रकरण आहे, त्यामुळे सावध राहा. इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नका, असा थेट इशारा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना दिला आहे.
रंजना प्रदीप नागपूरकर ही महिला सकाळी येऊन माझ्या घरी खूप रडत होत्या. त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले आहे. मी फक्त संदेश दिला आहे की, तुमचीही पण खूप प्रकरण माझ्याकडे आली आहेत. आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपार्या देत आहे. ते गप्प बसलेले होते, तरी तुमच्या टोळीने पुन्हा उचकवले आहे. माझे काहीच प्रकरण नाही. माझ्यावर केलेल्या प्रत्येक आरोपावर फौजदारी खटले दाखल केले, तर माझ्याविरोधात बोलणाऱ्याला संपूर्ण आयुष्य तुरुंगात जावे लागेल. आताच शहाणे व्हा. माझ्या नादी लागू नका. मी जर मागे लागलो तर माझ्याजवळ २२ पेक्षा अधिक प्रकरण आलेली आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल
रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल? संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय नाही. फक्त मंत्रिपद द्यायचे म्हटले होते तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला. त्यामुळे मंत्रिपद दिले तर पक्ष संपेल. रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचे नाही यामुळे माझा दिवस चांगला जात नाही. आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत. धनंजय मुंडे यांनी आमच्या नादी लागू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. गॅझेटिअरचा जीआर काढल्यानंतरही प्रमाणपत्र वाटप होत नसल्याबद्दल त्यांनी सरकार आणि प्रशासनाला सवाल केला आहे. अधिवेशनानंतर ठोस निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन उभे करण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.