“अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:40 IST2026-01-28T12:36:44+5:302026-01-28T12:40:25+5:30
Manoj Jarange Patil Reaction On Ajit Pawar Sad Demise: अजित पवार खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार होते. काही केल्या ही बातमी पटत नाही. काय बोलावे कळतच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

“अजित पवार गेले हे मनाला पटतच नाही, कधीही भरून न निघणारे नुकसान झाले”: मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Reaction On Ajit Pawar Sad Demise: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकाकूल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते बारामतीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले. आपल्या दादांची दुःखद बातमी समजली. अजितदादा यांचे निधन झाले, ही गोष्ट मनाला पटतच नाही. अनेकांशी संपर्क केला, त्यांनी ही बातमी खरी असल्याचे सांगितले. तरीही ही बातमी खरी आहे, यावर विश्वासच बसत नाही. राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही खूप मोठी हानी आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता होणे नाही. हे नुकसान भरून निघू शकत नाही. संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अजित पवार स्पष्टपणे काम करणारे नेते
अजित पवार स्पष्टपणे काम करणारे नेते होते. कोणाचे काम होणार असेल, तर होकार देणार. काम नसेल होणार, तर सरळ नाही सांगणार. सगळ्या लोकांचे यामध्ये नुकसान झाले आहे. सगळ्या सामाजिक प्रश्नांची जाण असणारे अजित पवार होते. सर्व जाती-धर्माच्या लोकांचे काम अजित पवार करायचे. राजकीय, सामाजिक खूप मोठी हानी झालेली आहे. महाराष्ट्रात नाही, तर देशात धाडसी निर्णय घेणारे अजित पवार मोठे नेते होते. अजित पवार यांच्यासारखे नेते पु्न्हा होणार नाहीत. आपल्या समाजाचेही मोठे नुकसान झाले. अजित पवार खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार होते. काही केल्या ही बातमी पटत नाही. काय बोलावे कळतच नाही, अशी भावना मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेदिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता. या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ५ व्यक्ती होत्या. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे एक पी.एस.ओ. आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सह-पायलट यांचा समावेश होता. डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणीही वाचू शकलेले नाही. विमानातील पाचही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.