‘परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट,यात निलंबित बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:31 IST2026-03-26T13:30:00+5:302026-03-26T13:31:02+5:30
Vijay Wadettiwar News: परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या प्रकारांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज गंभीर आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

‘परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट,यात निलंबित बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
मुंबई - परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या प्रकारांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज गंभीर आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार असून, वसुलीसाठी त्यांनी समांतर यंत्रणा उभी केली असून, राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतात,असा धक्कादायक आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर झालेली एसीबीची झालेली ची कारवाई हा एक पूर्वनियोजित कट आहे. तक्रारदाराने घेतलेला लांबचा प्रवास आणि टोल रेकॉर्डमधील तफावत हे सिद्ध करते की, हे प्रकरण केवळ पोटदुखे यांना अडकवण्यासाठी रचले गेले आहे, आसा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
विदर्भातील ६४ जण आरटीओमध्ये रुजू झाली आहेत, मात्र या नियुक्त्या खैरनार आणि भुयार यांच्या मर्जीने न झाल्याने आता हे अधिकारी त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणत आहेत. जे अधिकारी वसुलीला नकार देतात, त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवण्याची किंवा बदली करण्याची धमकी दिली जात आहे, याप्रकरणी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री या पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केली.
अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासाचा झालेला गैरवापर यावर बोट ठेवत वडेट्टीवार म्हणाले की, काही लोक तंत्र-मंत्राचा वापर करून खुर्ची टिकवण्याचे किंवा इतरांना हटवण्याचे प्रयत्न करत आहेत. हे कृत्य संविधानाची शपथ घेणाऱ्यांना शोभा देणारे नाही. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबी ट्रॅप लावून पकडण्यात आले तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली नाही आता त्यांनी शासकीय निवासस्थानाचा गैरवापर केला आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
पुणे जमीन घोटाळा असो वा आरटीओमधील वसुली, सरकार केवळ लहान माशांवर कारवाई करून मोठ्या माशांना वाचवत आहे. सध्याच्या सरकारमध्ये अंतर्गत गँगवॉर सुरू असून मंत्री एकमेकांविरुद्ध कट रचत आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.