Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:08 AM2019-09-29T06:08:52+5:302019-09-29T06:10:07+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : What will happen this time to the invincible state of the unbeaten state? | Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

Next

- असिफ कुरणे
कोल्हापूर : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे. अनेक राजकीय उलथापालथीत देखील या महारथींनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून हे नेते आपल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सत्तेत असो की विरोधात येथील जनतेने देखील आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांना विधानसभा सभागृहात पाठविले आहे. राज्यातील असेच काही अभेद्य मतदारसंघ व तेथील आमदारांचा आढावा.

गणपतराव देशमुख (सांगोला) :
सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून तब्बल ११ वेळा विजय मिळविला आहे. १९७८ व १९९९ मध्ये ते मंत्री होते. ‘देशात सर्वाधिक काळ आमदार’ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यानंतर सर्वाधिक काळ करुणानिधी हे १० वेळा आमदार राहिले आहेत.

शरद पवार, अजित पवार ( बारामती) :
पवार कुटुंबीय व बारामती यांचे वेगळे नाते असून हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून
शरद पवार व अजित पवार प्रत्येकी सहावेळा आमदार झाले आहेत. आता सातव्यांदा अजित पवार येथून मैदानात उतरतील. सन १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे या प्रथम येथून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर पवार कुटुंबाचेच या मतदारसंघावर वर्चस्व आहे.

जीवा पांडू गावित (सुरगाणा)
सुरगाणा व कळवण मतदारसंघांतून जीवा गावित सातव्यांदा आमदार झाले आहेत. १३ व्या विधानसभागृहात ते ‘सीपीआय’चे एकमेव आमदार आहेत. डाव्या पक्षांची पीछेहाट होत असताना गावित यांनी आपला डाव्यांचा गढ कायम राखण्यात यश मिळविले आहे.

जयंत पाटील (वाळवा, इस्लामपूर) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे १९९० पासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते सहावेळा आमदार झाले आहेत. त्यांनी मंत्री म्हणून अर्थ, गृह, ग्रामविकास अशी खाती सांभाळली. नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला.

एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) :
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा गड आहे. या मतदारसंघातून खडसे सहावेळा आमदार झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात सन १९९० मध्ये खडसे यांनी विजय मिळविला. तेव्हापासून ते येथे प्रतिनिधित्व करत आहेत.

बाळासाहेब थोरात (संगमनेर) :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ त्यांचा गड आहे. या ठिकाणातून ते सातवेळा विजयी झाले असून आठव्यांदा मैदानात उतरत आहेत. बी. जे. खताळ-पाटील यांच्यानंतर थोरात हे आमदार झाले.

राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) :
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे प्रतिनिधीत्व करणारे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे पाचवेळा विजय मिळवला आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र शिर्डी हा मतदारसंघ ठरला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

विलासराव देशमुख (लातूर ) :
लातूर येथून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा १९९५ मध्ये शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर विलासराव दोनवेळा विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर पुत्र अमित देशमुख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सुरूपसिंग नाईक (नवापूर )
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हा आरक्षित मतदारसंघ सुरूपसिंग नाईक यांचा गड. येथून ते आठवेळा विजयी झाले. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. २००९ मध्ये त्यांना १७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

आर. आर. पाटील (तासगाव) :
तासगाव मतदार संघाला
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी देशपातळीवर ओळख मिळवून दिली. सन १९९०
पासून त्यांनी सहावेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताई
पाटील या प्रतिनिधित्व करत आहेत.

पतंगराव कदम
(पलूस, कडेगाव ) :
काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम हे येथून सहावेळा निवडून आले व दोनदा पराभूत झाले होते. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर हा त्यांचा गड मानला जातो. कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले.


 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 : What will happen this time to the invincible state of the unbeaten state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.