कोल्हापूर/नागपूर/अकोला : गेले महिनाभर राज्यात मान्सून पावसाचा जोर असून जवळ जवळ ९५ टक्के महाराष्ट्र पाणीदार झाला आहे. धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. विदर्भाला मात्र यंदाच्या पावसाने अद्याप हुलकावणी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील धरणातील पाणीसाठा ३७ टक्के तर कोकणातील धरणातील पाणीसाठा ४४ टक्के झाला आहे. नाशिक विभागात ४० टक्के पाणीसाठा असून मराठवाडा व अमरावती विभागात अनुक्रमे ३६ व ३७ टक्के पाणीसाठा आहे.
नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी ३० टक्के साठा आहे. अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सोडण्यात येत असून त्यामुळे जायकवाडी धरणाची पातळी ३१ टक्के झाली आहे.
कोकणातील कोयना, कृष्णा पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहात असून तारळी, धोम व कोयना, कन्हेर, उरमोडी, वीर धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गतवर्षी मायनसमध्ये होते त्यामध्ये सध्या तब्बल ७३ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.
गेल्या महिनाभरात या धरणात ४० टक्के पाणीसाठा झाला असून धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. पुण्याच्या खडकवासला धरणात ६४ टक्के तर घोड धरणात ८० टक्के पाणीसाठा झाला आहे.
पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात अडीच फुटांची वाढ कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात अडीच फुटांची वाढ झाली. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.
१९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ४,८८५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती, पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पाणीपातळी २९ फुटांपर्यंत पोहोचली होती.
मराठवाड्यातील धरणांमध्ये मांजरा २७ टक्के, येलदरी ५० टक्के, अमदुरा ६३ टक्के, निम्न दुधना ३७ टक्के, खुलगापूर ५३ टक्के, भुसणी २९ टक्के, शिवणी ५० टक्के, निम्न तेरणा७० टक्के, सीना कोळेगाव ३१ टक्के, निम्न मनार ५१ टक्के , विष्णुपुरी २३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
सांगली-साताऱ्यात जोरदार, कोयना धरण ३३ टक्के भरले
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे अतिवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यात २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १०२ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सुमारे ३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरण ३३ टक्के भरले आहे.
पावसाअभावी विदर्भात ८० टक्के पेरण्या रखडल्या
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा वाढत आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे ८० टक्के पेरण्या रखडल्या आहेत. ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची चिंता आहे.
अकोला जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर
अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. प्रशासनाकडून खासगी विहिरींच्या अधिग्रहणाचा आधार घेतला जात आहे. पावसाअभावी काटेपूर्णा धरणातील साठा केवळ १३.९ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अकोला शहरात टंचाईचे गंभीर चटके बसत आहेत.
निम्मा जून संपला तरी तापमान कमी होईना
निम्मा जून महिना संपला तरी विदर्भातील तापमान कमी होईना. शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली. नागपूरमध्ये कमाल तापमान ३७.८ अंश होते. आता २४ पासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.