मुंबई : कोकण, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असताना विदर्भ, मराठवाडा व खान्देशात पावसाने हूल दिली होती. मात्र, अखेर बुधवारी रात्रीपासून या भागात पावसाचे धूमशान सुरू असून नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला.
यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसात झरी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील केमिकल कंपनीतील शेड कोसळून एक महिला कामगार जागीच ठार झाली. गंगा कंवर (२१) असे मृत महिला कामगाराचे नाव आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात सहा गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्याने १३० घरांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
झाडावर अडकले शेतकरी
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव (ता. मेहकर) येथील पाच शेतकरी शेतात काम करत असताना अचानक आलेल्या पुरात अडकले. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने पाचही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील आसेगाव ते मसलापेनदरम्यान पैनगंगा नदीला आलेल्या पुरात पेडगाव येथील दोन शेतकरी अडकले आहेत.
पुरात अडकले तीन विद्यार्थी
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील डीगडोह येथे यशोदा नदीला पूर आल्याने तीन विद्यार्थी अडकले. बचाव पथकाने त्यांना दुपारी सुरक्षित बाहेर काढले. कारंजा (घाडगे) तालुक्यात वीज कोसळून दोन सख्खे चुलत भाऊ गतप्राण झाले.