ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 07:15 IST2025-06-18T07:13:15+5:302025-06-18T07:15:02+5:30
Dangerous bridge In Thane and Raigad: वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पुलांची अवस्था बिकट

ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमधील पूल हे तुलनेने सुस्थितीत असले तरी ग्रामीण भागातील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत किंवा त्यांच्या देखभालीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. पुण्यात पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ शकते, अशी भीती विविध पुलांची अवस्था पाहिल्यावर व्यक्त होत आहे.
मावळ येथील कुंडमळा धोकादायक पूल कोसळल्यानंतर ठाणे व रायगढ़ जिल्ह्यातील धोकादायक पुलांचा लोकमतने आढावा घेतला. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कुठे पुलाला कठडे नाहीत तर कुठे पुलातून झाड उगवले आहे. काही पूल २०० वर्षे जुने झाले तरी त्याची दुरुस्ती नाही, तर काही तसेच पडून आहेत.
शहापूर, मुरबाड व कल्याण या तालुक्यांना ओडणारा
वासिंदजवळील भातसा नदीवरील गैरसे पूल हा असाच वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक झाला आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरील दोन्ही बाजूंकडील कठडे तुटलेले आहेत. या धोकादायक पुलाकडे मनसेचे वासिंद शहरप्रमुख अमोल बोराडे यांनी लक्ष वेधले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्याणचे उ कार्यकारी अभियंता एन. बी. हिरवे यांनी सोमवारी पुलाची पाहणी केली. या पुलावरील स्लॅब मजबूत असून पूल कमकुवत झालेला नाही. पुलाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत, लवकरच त्यावर उपाययोजना केली जाईल, असे हिरवे यांनी सांगितले.
दहिवली पुलावर दरवर्षी पाणी
कर्जत तालुक्यात मोहिली व नेरळ नजीकच्या दहिवली पुलावरून दरवर्षी पाणी जाते. कर्जत शहरातील उल्हास नदीवर असलेला पूल सर्वांत जुना आहे. तो दगडी कमानीच्या पद्धतीने बांधला असल्याने ६०-६५ वर्षापूर्वी बांधलेला हा पूल दररोज मोठमोठी वाहनांचे वजन पेलतो. हा पुल कधीही कोसळू शकतो, असे रहिवासी सांगतात. वासरे खॉड्यातील मोहिली गावाजवळ सुमारे ४५ वर्षापूर्वी बांधलेल्या पुलावरून गेल्या चार वर्षांपासून पाणी जात आहे. माहिनी पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे, दहिवली पुलाची बांधकाम विभागाकडे आहे.
हा पूल अपघाताला कारणीभूत ठरू शकतो
अलिबाग तालुक्यातील पालव गाव ते थेरौंडा आगलेची वाडीमधील खाडीवरील साकव सुमारे सात दशकांचा असलेला पूर्णपणे जीर्ण झालेला असून तो नवीन बांधावा, अशी मागणी आहे. हा साकव नव्याने उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल, तसेच त्या भागात येत असलेल्या विविध प्रकल्पांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.सध्या तरी जीवनवाहिनी असणारा हा साकच जीर्ण झाला आहे. तो अपघाताला कारणीभूत ठरू शकतो, अशीच परिस्थिती आहे. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम रायगड जिल्हा परिषदेकडे आहे.
पिलरला रंगरंगोटी, पूल मात्र तसाच
अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या परिसरात मंदिरात जाण्यासाठी वालधुनी नदीवर दोन पूल आहेत. अत्यंत वर्दळीचा हा पूल पावसात पाण्याखाली जातो. मंदिरात गर्दीच्या वेळेस दर्शनाची रांग पुलापर्यंत येते. पावसाळ्यात हा पूल वाहून आण्याचा धोका निर्माण झाला आहे. याआधी या पुलाचे कठडे अनेक वेळा वाहून गेले आहेत. मात्र, या पुलाची हवी तशी दुरुस्ती झालेली नाही.
पूल बंद तरीही वाहतूक सुरू, रोज पार्किंगही होते
रायगड जिल्ह्यात ब्रिटिशकालीन महाड पूल २०१६ मध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्याने ४० नागरिकांचा पाण्यात वाहून मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यभरात धोकादायक ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते वाहतुकीस बंद केले. त्यापैकीच पनवेल शहराला जोडणारा गाढी नदीवरील पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला असला, तरी त्यावरील वाहतूक अद्यापही सुरूच आहे.
६२ वर्षांपासून पुलाची डागडुजी झालेली नाही
मुरूडला जोडणाऱ्या एकदरा पुलाची ६२ वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. त्याचे कठडे व बेरिंग पूर्णतः खराब झाल्याने हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावरून एकदरा, माझेरी, जंजिरा किल्ला, राजपुरी, खोरा, डोंगरी या गावांतील ग्रामस्थ दररोज मुरुड शहराकडे रोज ये-जा करतात. पुलाच्या डागडुजीसाठी बांधकाम विभागाला ४ कोटी रुपये मंजूर केले होते. काम २० जानेवारी २०२३ पासून सुरु झाले पण ३ महिन्यातच काम बंद पडले.
२०० वर्षापूर्वीच्या पुलावरून अजूनही वाहतूक सुरू
अलिबाग तालुक्यातील खडताळ पूल हा २०० वर्षापूर्वी बांधण्यात आला आहे. तो आता जीर्ण झाला आहे. मात्र त्याची दुरुस्ती अद्यापही केली नाही. त्यामुळे हा पूल कथीही पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे हजारो पूल, साकच आहेत. यातील अनेक जीर्ण होत चालले आहेत. ते बंद करून नवीन बांधणे आवश्यक आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले आहे.