महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
By यदू जोशी | Updated: June 12, 2025 07:15 IST2025-06-12T07:07:39+5:302025-06-12T07:15:10+5:30
Maharashtra Local Body Elections: राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी सद्यस्थितीत आहे त्याच एकसंधतेने निवडणुकीला सामोरे जाणार का हा प्रश्न कायम आहे.

महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
- यदु जोशी
मुंबई - राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी सद्यस्थितीत आहे त्याच एकसंधतेने निवडणुकीला सामोरे जाणार का हा प्रश्न कायम आहे. सत्तेतील तीन मित्र पक्षांमध्येच दिसत असलेल्या स्पर्धेमुळे महायुतीच्या, तर उद्धव-राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या शक्यतेने मविआच्या अस्तित्त्वावरील प्रश्नचिन्ह गडद होत आहे.
कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत नेत्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गेली अडीच तीन वर्षे आणि स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असेल.
मुंबईत वाढलेले १० लाख मतदार कोणाच्या बाजूने जाणार?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत १० लाख मतदार वाढले होते. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू असताना आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत जर नवीन मतदार यादी आली तर विधानसभेला वाढलेले मतदार कमी होणार की त्यात आणखी वाढ होणार, यावरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास काय?
‘लोकांच्या मनात आहे ते होईल’ असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी राज यांना सोबत घेण्याचे संकेत दिलेले असताना राज आणि आदित्य यांना एकाच पोस्टरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवसैनिकांनी दिल्या आणि ते पोस्टर थेट सेनाभवनसमोर लावल्याने मनोमीलनाच्या चर्चेला वेग आला आहे. ठाकरे एकत्र आले तर मुंबई, ठाण्याच्या पट्ट्यात मराठी माणसांची मोट बांधली जाईल व त्याचा फटका बसू शकतो हे गृहीत धरून भाजपकडून प्लॅन बी तयार करण्यात येत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. हिंदी, गुजराथी, दाक्षिणात्यबहुल भागात अधिक जोर लावण्याची रणनीती आखून उद्धवसेनेचे काही मोहरे भाजप वा शिंदेसेनेच्या गळाला लावले जाण्याची शक्यता आहे.
दोन्ही पवार एकत्र आल्यास काय?
अजित पवारांसोबत जाण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलेले होते. मात्र, याबाबत माध्यमांनी सुळे यांना विचारले असता, ‘त्यासाठी विशिष्ट टाइमलाइन नाही,’ असे त्या म्हणाल्या. टाइमलाइन नाही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दोघे एकत्र येऊ शकतात, असाही या विधानाचा अर्थ काढला जात आहे. तसे झाल्यास मविआचे अस्तित्व धोक्यात येईल. शरद पवार यांनी मात्र विचारांबरोबर राहा, असे आवाहन पक्षजनांना केल्याने त्यांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि पर्यायाने भाजपसोबत जाणार नाही, असाही घेतला जात आहे.
नेते म्हणतात पण खाली काय?
आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असले तरी ठिकठिकाणची परिस्थिती त्याच्या विपरीत आहे. अनेक ठिकाणी सामंजस्याने जागावाटप व तिकीटवाटप महायुतीला अशक्य आहे. त्यातच भाजपने शिंदेंच्या प्रभावपट्ट्यातील विरोधक आपल्याकडे खेचणे सुरू केले आहे. तर शिंदे हे भाजप आणि अजित पवारांच्या प्रभावपट्ट्यातील त्यांच्या विरोधकांना आपल्या पक्षात आणत असल्याचे चित्र आहे.