"महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA ने विमानतळावरील...", अजित पवारांच्या अपघातांबद्दल अमोल मिटकरींची नवी मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:44 IST2026-02-06T13:40:58+5:302026-02-06T13:44:08+5:30
अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका राजकीय नेत्यांकडून उपस्थित केल्या जात असून, त्याची उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.

"महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA ने विमानतळावरील...", अजित पवारांच्या अपघातांबद्दल अमोल मिटकरींची नवी मागणी काय?
अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ कोसळले. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच हे विमान अपघातग्रस्त झाले. या विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशीतून काही बाबी समोर आल्या आहेत. पण, यावरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. "थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे", असे म्हणत मिटकरींनी नवीन मागणी केली आहे.
अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झालेल्या या विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आल्याची माहिती समोर आली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला नाही, तर त्याला मानवी चुकाही कारणीभूत असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
अमोल मिटकरींनी अहवालावरून सुनावले
प्राथमिक अहवालाचे वृत्त समोर आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी म्हणाले, "दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे. दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती. अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला व जनता मान्य करेल!"
आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबद्दल म्हटले आहे की, "महाराष्ट्र पुरावा मागतोय DGCAनी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा", अशी मागणी त्यांनी केली आहे.
विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केली शंका
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काही शंका उपस्थित केल्या. खासदार सोनावणे म्हणाले, "अजित पवारांच्या अपघाताबद्दल वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत."
"विमानात ६ लोक होते, तर ५ मृतदेह का मिळाल्या? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. विमान वरच फुटले, वरच स्फोट का झाला?", असे प्रश्न खासदार बजरंग सोनावणे यांनी विचारले आहेत.