...म्हणून 'लाव रे तो व्हिडीओ'ची हवा झाली, 'इम्पॅक्ट' नाही; यावेळी 'राजनीती' बदलणार!

By अमेय गोगटे | Published: October 9, 2019 03:53 PM2019-10-09T15:53:30+5:302019-10-09T16:02:06+5:30

Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडा, हा राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम होता.

Maharashtra Election 2019: What will be Raj Thackeray strategy for Vidhan Sabha Election | ...म्हणून 'लाव रे तो व्हिडीओ'ची हवा झाली, 'इम्पॅक्ट' नाही; यावेळी 'राजनीती' बदलणार!

...म्हणून 'लाव रे तो व्हिडीओ'ची हवा झाली, 'इम्पॅक्ट' नाही; यावेळी 'राजनीती' बदलणार!

googlenewsNext
ठळक मुद्देराज ठाकरे ९ ऑक्टोबरपासून प्रचारसभांचा धडाका सुरू करणार आहेत. 'ए लाव रे तो व्हिडीओ' या वाक्याने लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीत धुमशान केलं होतं. यावेळी ईडी नोटीस हे राज ठाकरेंचं प्रमुख अस्त्र असू शकतं.

काय करूया, लढूया की नको, यावर अगदी शेवटपर्यंत विचार करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळतोय. ते स्वाभाविकही आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते संभ्रमातच पडले होते. आपण जे करतोय, ते कुणासाठी, कशासाठी हेच त्यांना कळत नव्हतं. लोकांच्या वरातीत नाचत असल्यासारखंच त्यांना वाटत होतं. पण यावेळी 'घरचं कार्य' असल्याने ते खूश आहेत. त्यांचा हा उत्साह वाढवण्यासाठी राज ठाकरे प्रचारसभांचा धडाका सुरू करणार आहेत. त्यांच्या प्रचाराबद्दल विशेष उत्सुकता आहे. त्याचं कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत गाजलेली 'ए लाव रे तो व्हिडीओ' ही सीरिज. या मालिकेची चर्चा खूप झाली, टीआरपीही जोरदार मिळाला, पण तिचा आशय खरंच तगडा होता का आणि तिनं अपेक्षित परिणाम साधला का, या प्रश्नाचं उत्तर सरसकट 'हो' असं देता येणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडा, हा राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. आश्चर्य म्हणजे, मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी कधी पक्षाच्या प्रसारासाठीही राज्यभर जाऊन सभा घेतल्या नव्हत्या. त्यामुळे ते अचानक एवढे का सक्रिय झालेत, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांच्या मनात आला होता. पण नंतर, 'माहौल हम बनाएंगे' म्हणत आपल्या नेहमीच्या स्टाईलने राज ठाकरेंनी वातावरण बदलून टाकलं होतं. 'ए लाव रे तो व्हिडीओ' या वाक्याने प्रचाराच्या रणधुमाळीत धुमशान केलं होतं. नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स, वर्तमानपत्रातील कात्रणं, हरिसाल गावचा तरुण, 'मी लाभार्थी'च्या जाहिरातीत फोटो वापरलेलं - पण लाभार्थी नसलेलं कुटुंब हे सगळं त्यांनी स्टेजवरून दाखवलं होतं आणि मोदी सरकारनं कसं फसवलं हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच हे 'भारी' वाटलं. कारण, प्रचाराची ही स्टाईल नवी होती आणि त्याला राज ठाकरेंच्या वक्तृत्वाची, वलयाची जोड होती. पण, कालांतराने त्यात तोच-तोचपणा येत गेला आणि त्या पडद्यामागचं वस्तुस्थितीही मतदारांच्या लक्षात आली.

प्रत्येक कार्यक्रमाचं एक औचित्य असतं. त्यानुसारच तिथे बोलावं लागतं, हे राज ठाकरेंसारख्या वक्त्यालाही ठाऊक आहेच. राजकारणात तर असं अनेकदा पाहायला मिळतं. शरद पवारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी पवारांचा गुणगौरव करणं स्वाभाविकच आहे. पण म्हणून निवडणूक प्रचारातही ते तसंच बोलतील का? नक्कीच नाही. पण, राज ठाकरेंनी हे दोन व्हिडीओ पाठोपाठ दाखवून मोदींचा दुटप्पीपणा दाखवून देण्याची 'राजनीती' केली. ती थोड्याच दिवसांत जनतेला उमगली. जवानांपेक्षा व्यापारी जास्त जोखीम घेतात, हा व्हिडीओही याच गटात मोडतो, असं म्हणावं लागेल. कारण, जवानांबद्दल मोदींना आस्था नाही असं वाटावं अशी कृती मोदींनी पाच वर्षांत केली नव्हती. 

राजकीय भूमिका बदलणंही राजकारणात नवं नाही. राज ठाकरे स्वतः नरेंद्र मोदींबद्दल काय बोलायचे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल काय बोलायचे आणि सध्या त्यांची भूमिका काय आहे, हे सगळेच पाहताहेत. त्यामुळे जीएसटीबद्दलची भूमिका मोदींनी नंतर बदलली, हा व्हिडीओही तितकासा प्रभावी ठरला नाही. सभांमध्ये या व्हिडीओला टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद मिळाला, पण मनसैनिकांव्यतिरिक्त इतरांनी तो कितपत गांभीर्याने घेतला हा प्रश्नच आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल संशय व्यक्त करणं, एअर स्ट्राईकवरून अजित डोवालांना लक्ष्य करणं हे तर अनेक मनसैनिकांनाही 'मनसे' पटलं नव्हतं. त्यामुळेच 'लाव रे तो व्हिडिओ'चा म्हणावा तसा 'इम्पॅक्ट' झाला नाही. 

राज ठाकरेंचं ठरलंय?  

लोकसभेला मनसेचे उमेदवारच रिंगणात नसल्याने गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही, असा दावा मनसैनिक करतात. तो अगदीच चुकीचा नाही आणि म्हणूनच यावेळी राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण, यावेळी ते आपल्या हक्काच्या उमेदवारासाठी मतं मागणार आहेत. ती कोणत्या मुद्द्यावर मागतात, सरकारवर कसा हल्ला करतात, काय आश्वासनं देतात, याबद्दल उत्सुकता आहे. 

मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी नोटीस हे राज ठाकरेंचं प्रमुख अस्त्र असू शकतं. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यांची साडेआठ तास चौकशीही करण्यात आली. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. भाजपा ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप सर्वच विरोधकांनी केला आहे. हाच राज यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. फक्त, ते आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी मतदारांना भावनिक साद घालू शकतात. लोकसभेवेळी त्यांनी ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर थेट हल्ला चढवला, त्याऐवजी ते या दोघांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधतील, असंही बोललं जातंय. 

अर्थात, विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी थोडं अधिक नियोजन, आखणी करणं गरजेचं होतं, असं राजकीय जाणकारांना वाटतंय. ईडी नोटिशीनंतर ते सक्रिय होतील असं वाटत होतं. अशा कितीही चौकश्या केल्या, तरी तोंड बंद करू शकणार नाही, या त्यांच्या विधानाने मनसैनिकांना ताकद दिली होती. पण नंतर ते अगदीच गप्प झाले. आता 'स्लॉग ओव्हर्स'मध्ये त्याच बॉलवर षटकार ठोकून ते बाजी मारतात का, हे पाहावं लागेल!

Web Title: Maharashtra Election 2019: What will be Raj Thackeray strategy for Vidhan Sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.