राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:43 IST2026-03-06T17:42:33+5:302026-03-06T17:43:43+5:30
Dhananjay Munde: हा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय

राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे
Dhananjay Munde: स्व. अजितदादांच्या विकासाच्या व्हिजनला आजचा अर्थसंकल्प समर्पित करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय आज सभागृहात मांडला. महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सुशासन आणि सर्वसमावेशक अशा चार स्तंभांच्या माध्यमातून राज्याच्या चौफेर विकासाची चतुसूत्री मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
२५ सप्टेंबरपर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंतचे कर्ज माफ करणे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा ही महायुती सरकारवर जनतेने टाकलेल्या विश्वासबद्दलची कृतज्ञता आहे. या निर्णयाबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
कृषी समृध्दी मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ५४ टीएमसी पाणी नार पार मधून मराठवाड्यात आणणे यांसह विदर्भ, खानदेश व कोकणातील नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी सरकारचे विशेष आभार मानले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासह, रस्ते, महामार्ग, सागरी मार्ग, मेट्रो असे अनेक प्रकल्प मंजूर करताना एक हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रिट रस्त्याने जोडण्याचा घेतलेला निर्णय हा आगामी काळात क्रांतिकारक ठरणार आहे.
प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा, बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचा राज्य शासन हिस्सा, तसेच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, बीड जिल्हा रुग्णालय येथील मोठ्या विकासकामांना भरघोस निधी मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोग व अन्य शासकीय विभागात ७५ हजार पदनिर्मिती तसेच दीड लाख उद्योजक व ५० हजार स्टार्ट अप्स यांसह रोजगार निर्मितीचे ठरवण्यात आलेले लक्ष्य हे अर्थसंकल्पाची दूरदृष्टी आणि सामर्थ्य सिद्ध करणारे आहे. कौशल्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र जागतिक पातळीवर स्पर्धा करत असून इथली तरुणाई महाराष्ट्राची ओळख जगाच्या पाठीवर सर्वात प्रगत राज्य म्हणून करण्यासाठी पूरक व्यवस्था या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
आज स्व. अजितदादा स्वर्गातून पाहत असतील तर त्यांना नक्कीच आनंद वाटत असेल, असे मला वाटते. शासनाने दादांचे स्मारक आणि दादांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला, याचेही मी मनापासून स्वागत करतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या आठवणी जाग्या केल्या.