'रोहयो मजुरांची संख्या घटली, केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने निधी द्यावा’, विजय वडेट्टीवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:39 IST2026-02-25T12:34:10+5:302026-02-25T12:39:35+5:30
Maharashtra Assembly Budget Session:

'रोहयो मजुरांची संख्या घटली, केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने निधी द्यावा’, विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई - राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही,असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मजुरांची संख्या घटली आहे. नागपूर विभागात ९९२ कोटी रुपयांचा निधी थकीत आहे. केंद्र सरकार राज्याला पैसे देत नाही आणि राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून पैसे खर्च करण्यास तयार नाही. यामुळे ग्रामीण भागातील गरीब आणि शेतकरी कुटुंबे अडचणीत आली आहे,अस वडेट्टीवार म्हणाले.
या मजुरांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन केले म्हणून २० वर्षांपासून काम करणाऱ्या रोजगार सेवकांना कामावरून काढून टाकले जात आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १९ लोकांना केवळ आंदोलनात सहभागी झाले म्हणून कामावरून कमी करण्यात आले, हा अन्यायकारक निर्णय आहे. ग्रामसभेने निवडून दिलेल्या रोजगार सेवकांना शासन कोणत्या अधिकारात कामावरून काढत आहे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार यांच्या प्रश्नावर मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहात स्पष्ट केले की, कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून कमी केले जाणार नाही. मागणीनुसार काम देण्याचे धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तसेच केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून ही योजना अधिक सक्षमपणे राबवली जाईल.सर्व मजुरांचे पैसे देखील दिले जातील असे आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिले.