Keshav Upadhye:"बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली", भाजप नेत्याचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:47 IST2022-04-10T19:50:21+5:302022-04-10T20:47:47+5:30
Keshav Upadhye on Uddhav Thackeray: "मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'हाता'साठी मतदान मागावं लागतं आहे."

Keshav Upadhye:"बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली", भाजप नेत्याचा घणाघात
मुंबई: आज राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि भाजप-सेना युतीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांच्या या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
"बाळासाहेबांची शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली"
केशव उपाध्ये यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. "जे करतो उघडपणे करतो, लपून-छपून करत नाही. मग मुख्यमंत्री पदाबाबत बंद दाराआड चर्चा केली असा खोटा दावा कसा करू शकता? प्रचाराच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं भाजपाच्या सर्व नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते, तेव्हा गप्प होता. निकाल लागल्यानंतर जनतेशी विश्वासघात करुन मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली," असा घणाघात उपाध्ये यांनी केला.
"मुख्यमंत्रिपदासाठी ’हाता’पुढे टेकले हात"
ते पुढे म्हणाले, "आज हेच मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'हाता'साठी मतदान मागावं लागतंय, इतकी मुख्यमंत्रीपदाची हौस बरी नव्हे. जे काम करतो मनापासून करतो, होय नक्कीच! गृहमंत्र्यांची महिन्याला 100 कोटींची वसुली, कोविड काळात भ्रष्टाचार, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे, अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन भरलेली गाडी ठेवलेल्या अधिकाऱ्याची जाहीरपणे पाठराखण करणे, दाऊदसोबत जमिनीचा आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालणे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी विरोधकांना 'टोमणेबॉम्ब' मारणे. ही सगळी कामे मनापासून करता, ते जाहीर कबूल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक वाटते," अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी केली.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
"आम्ही कमी पडलो तरी चालेल, पण खोटं कधीच बोलणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपवाले म्हणतात की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने देशात एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. भाजपला खरचं हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल, तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला? नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपच्या झेंड्यावरही अटलजी, अडवाणींचा फोटो नसतो. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातो, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, " असा हल्लाबोल उद्दव ठाकरेंनी केला होता.