बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 21:00 IST2025-10-12T20:59:18+5:302025-10-12T21:00:36+5:30
CJI B.R. Gavai: दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले.

बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
मंडणगड: दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल. जेणेकरुन बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.
मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) अमृता जोशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत, सदस्य संग्राम देसाई, वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद लोखंडे, आमदार किरण सामंत, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, काेकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दरडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालयाच्या इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच न्यायदान कक्ष, ग्रंथालयाचेही उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश गवई म्हणाले की, आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यायमूर्ती म्हणून मला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन आणि मंडणगड न्यायालय इमारतीचे उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम माझ्या २२ वर्षांतील महत्त्वाचे आहेत.
अवघ्या २० दिवसात कोल्हापूर येथील जुन्या इमारतीचा कायापालट करुन खंडपीठ सुरु केले. नाशिक, नागपूर, मंडणगड येथील इमारती पहा. विविध तालुक्यातील न्यायालयांच्या इमारती, दर्यापूर तालुक्यातील इमारत पहा. मी अभिमानाने सांगू शकतो, देशातील कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तराची न्यायालये, एवढ्या सुंदर इमारती असणार नाहीत, असेही सरन्यायाधीश गवई म्हणाले.