दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या अपघातावरून राज्यात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत या अपघाताचा तपास करण्याची मागणी केली. रोहित पवार नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेवरून राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होते, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांना अभय का? असा सवाल त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून केला आहे. VSR विमान कंपनीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला?
"कंपनीच्या मालकाचं वजन सरकारपेक्षा जास्त आहे का?"
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये कडक शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे. "निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केलं जातं, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळं लावायला पाहिजे होतं."
सरकारच्या दिरंगाईवर बोट ठेवताना त्यांनी संशय व्यक्त केला. "कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, यामुळे सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?"
VSR कंपनीची सेवा देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सर्वपक्षीय राजकीय नेते घेतात. याकडे लक्ष वेधताना रोहित पवार यांनी म्हटले की, "या महत्त्वाच्या व्यक्तींसह पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? जर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून ही कंपनी सेवा देत असेल, तर ती सर्वांसाठीच धोकादायक आहे."
तात्काळ बंदी घालण्याची मागणी
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून VSR कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या देशातील विमान सेवेवर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.