महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:05 IST2025-06-28T17:11:34+5:302025-06-28T18:05:29+5:30

मातृभाषेत शिक्षण घेतलेले कोणत्याही व्यक्तीला जास्त लवकर आत्मसात होते, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ५ वी नंतर हिंदी शिकवावी असं राष्ट्रवादीची मागणी आहे.

Hindi vs Marathi: Split in the Mahayuti government, Devendra Fadnavis- Eknath Shinde alone; Hindi should not be allowed till 5th standard, Ajit Pawar NCP Stand | महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका

महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका

मुंबई - राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात जनतेत नाराजीचे वातावरण आहे. त्यातच पहिल्यांदाच मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. येत्या ५ जुलैला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला कलाकार, साहित्यिकांपासून अनेक संस्थांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्येच मतभेद असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी नको अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मत मांडले होते. आता दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते पुढे आले आहेत. यात मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले की, लोकशाहीत विरोधी पक्षाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. हिंदीबाबत आमच्या पक्षाची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. पहिली ते चौथीपर्यंत हिंदी नको असं त्यांनी म्हटलं आहे. आमच्या पक्षाशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाचवीनंतर हिंदी असावी ही पक्षाची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल तेव्हा अजितदादा नक्कीच या विषयावर चर्चा करतील असं त्यांनी सांगितले. 

तसेच पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील. कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल असा निर्णय महायुती सरकार घेणार नाही. केंद्रातील मोदी सरकारनेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. मराठी भाषेविरोधात जाईल असा कुठलाही निर्णय महायुती सरकार घेणार नाही असंही मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महायुतीचे तिन्ही नेते एकच बोलत आहेत. गैरसमज करू नका. महायुती सरकारने अनिवार्यता काढली. हिंदी सक्ती नाही असं अजितदादा म्हणतायेत तेही सत्य आहे. पाचवी, सहावी, सातवीची हिंदी सक्ती सरकारने काढली आणि ती पर्यायी केली. त्यामुळे अजितदादाही तेच म्हणतायेत जे जीआर म्हणतोय आणि जीआरमध्ये घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणतायेत असं सांगत भाजपा नेते आशिष शेलार यांनी सारवासारव केली आहे.  

हिंदीचा अट्टाहास करू नये

मातृभाषेत शिक्षण घेतलेले कोणत्याही व्यक्तीला जास्त लवकर आत्मसात होते, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ५ वी नंतर हिंदी शिकवावी. त्या अगोदरचा अट्टाहास करू नये. जसे लहान लेकराला कळते होऊ पर्यंत आईपासून दूर करणे नैतिक दृष्ट्या योग्य नाही, तसेच मुलांना सुद्धा समज येऊपर्यंत मातृभाषेपासून दूर करणे योग्य नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुलांच्या डोक्यावर अजून एका भाषेचे ओझे देण्यापेक्षा त्यांना भविष्यातील प्रकाशाच्या वाटा दाखवणे गरजेचे आहे. मुलांच्या भविष्याची काळजी आहे तर त्यांना ५ वी पर्यंत विविध कला, क्रीडा आणि टेक्निकल प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर त्यांना तिसरी भाषा शिकवावी. पहिली ते चौथी पर्यंत हिंदीच काय कोणतीही तिसरी भाषा नसावी. शिक्षण मंत्री महोदय हिंदी अनिवार्य नाही म्हणता परंतु पर्याय म्हणून अभ्यासक्रमात ठेवता, पाचवीपर्यंत हिंदी नकोच असं सूरज चव्हाण यांनी स्पष्ट म्हटलं आहे. 

Web Title: Hindi vs Marathi: Split in the Mahayuti government, Devendra Fadnavis- Eknath Shinde alone; Hindi should not be allowed till 5th standard, Ajit Pawar NCP Stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.