मुंबई - मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर अजिबात तडजोड केली जाणार नाही. सरकारने समिती नेमली तिचा अहवाल काहीही येवो, पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. हे मराठीवरील संकट म्हणूनच पाहायला हवे. त्याला राजकीय लेबल लावू नका. ५ तारखेला मोर्चा ऐवजी मेळावा होईल. या मेळाव्यात आणखी बोलेनच असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा खडसावले.
राज ठाकरे म्हणाले की, हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करायला सरकारला भाग पाडले. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे, साहित्यिकांचे, पत्रकारांचे आणि राजकीय पक्षांचे आभार आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही. ५ जुलैला जर मोर्चा निघाला असता तर तो न भूतो असा झाला असता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण अनेकांना आली असती. या विषयावर कुठलीही तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयजनसारखे आहे, हळूहळू गोष्टी आतमध्ये पेरायच्या. हा प्रयत्न सरकारने करून पाहिला परंतु तो अंगाशी आला. समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा किंवा नाही याचे आम्हाला देणेघेणे नाही. या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही. परत या गोष्टी सरकारने आणूच नये. हिंदी आणण्याचा का प्रयत्न केला जातोय हे माहिती नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. ती एका प्रांताची भाषा आहे. उत्तर भारतातील अनेक जण इथे येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे. दीडशे वर्षाची भाषा ३०० वर्षाच्या भाषेवर वरचढ ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर संजय राऊतांचा फोन आला होता. मोर्चा रद्द झाला तरी विजयी मेळावा ५ जुलैला होईल. हा विजय मराठी माणसाचा आहे. त्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले पाहिजे. ज्याप्रकारे वर्तमानपत्र, टेलिव्हिजन चॅनेलने हा विषय लावून धरला त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. ५ तारखेचा विजयी मेळावा कुठे होईल, केव्हा होईल हे आमच्या नेत्यांशी आणि त्यांच्याशी बोलून ठरवले जाईल. मोर्चा असो वा विजयी मेळावा याला राजकीय पक्षाचे लेबल लावू नका. युती, आघाडी होत राहील मराठी भाषेवर संकट म्हणूनच याकडे पाहावे. ५ जुलैच्या मेळाव्यात आणखी काही गोष्टी बोलेन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काळात हा विषय आल्याचे मला कळले, मला अजून त्याची माहिती नाही परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणूस, मराठी भाषेविरोधात कुणीही असेल तर त्याला मी विरोध करणारच. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला हीच विनंती आहे. मराठी भाषा, मराठी माणूस यावर तडजोड होता कामा नये. सर्व बाजूने महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी माणसाने आजूबाजूला काय गोष्टी घडतायेत त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असं आवाहनही राज यांनी केले आहे.
विरोधकांनी इतर विषयांवर लक्ष घालावे
मराठीच्या मुद्द्यावर कोणताही झेंडा नसेल, मराठी अजेंडा असेल हे मी आधीच जाहीर केले होते. राज्य सरकारमधील अनेक मंत्री, आमदारांनी या निर्णयाला विरोध केला. अजित पवारांनीही याला विरोध केला हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. मग जाधव येऊ द्या नाहीतर अजून कुणी येऊ द्या. महाराष्ट्रात ज्याप्रकारे मराठी माणसांनी विरोध केला आहे याची जाणीव जाधव यांना असावी. महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबले आहेत. भाषेवर उगाच विषय आणू नका. विधानभवनात जे विरोधक आहेत त्यांनी अधिवेशनात या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये. जे इतर विषय आहेत त्यावर बोलावे. शैक्षणिक अजून बऱ्याच समस्या आहेत. शिक्षकांना पगार नाही. शिक्षकांवर इतर बोझा टाकला जातो यावर विरोधकांनी लक्ष घालावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.