उष्णतेच्या लाटेमुळे भट्टी; मुंबईचा पारा ३८.४ अं.से.वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 07:44 IST2026-03-10T07:43:57+5:302026-03-10T07:44:16+5:30
मुंबई : पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आली असून, मंंगळवारीही महामुंबईला उष्णतेच्या लाटेचा फटका ...

उष्णतेच्या लाटेमुळे भट्टी; मुंबईचा पारा ३८.४ अं.से.वर
मुंबई : पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आली असून, मंंगळवारीही महामुंबईला उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे. उष्णतेच्या लाटेचा विपरित परिणाम म्हणून मुंबईचे कमाल तापमान सोमवारी ३८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मंगळवारीही पारा ३८ वर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महामुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली. गेल्या आठवड्यात मुंबई वगळता नवी मुंबईसह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आली होती. या लाटेचा जोर ओसरतो तोच पुन्हा महामुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे. यावेळी मुंबईतही उष्णतेची लाट नोंदविण्यात आली आहे. मुंबईच्या कमाल तापमानातील वाढीमुळे सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा बसत होत्या. विशेषत: १२ ते २ यावेळेत सूर्य डोक्यावर आल्याने मुंबईची भट्टीसदृश्य स्थिती झाली होती.
मंगळवारी कुठे उष्णतेची लाट?
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अकोला, अमरावती, वर्धा.
मुंबईत सोमवारी सकाळीच हवामान गरम नोंदविण्यात आले. तापमानाची नोंद ३८.४ झाली असून, मंगळवारी महामुंबईत उष्णतेची लाट राहील.
कृष्णानंद होसाळीकर, हवामान तज्ज्ञ
राजस्थान व गुजरात प्रदेशात निर्माण झालेल्या अँटीसायक्लोनचा परिणाम म्हणून उष्ण वारे राज्याकडे वाहत आहेत. पूर्व दिशेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे कोकणात तापमान अधिक आहे.
अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक