ऑनलाईन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. १० - संपूर्ण कोकण पट्ट्यात परतीच्या पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून याचा फटका भात शेतीला बसला आहे. पावसाच्या संततधारेने कापणीला आलेली भातशेती जमिनीवर लोळत पडली आहे. धान फोल होण्याबरोबरच त्याला अंकुर फूटण्याची शक्यता वाढली आहे. परतीच्या पावसाने असेच सातत्य राखले तर शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्गात ग्रामीण भागातील ८० टक्के जनता भातशेतीवर उदरनिर्वाह करते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भाताचे उत्पादन भरघोस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता भातपिक कापणीस आले असताना शनिवारपासून कोकणात संततधार पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. किमान पुढील पंधरा दिवस पावसाने विश्रांती घेणे शेतकऱ्यांसाठी हितावह ठरणार आहे.