अदानींची भेट अन् दिल्ली दौरा अचानक रद्द, शरद पवार बारामतीला जाणार; NCP विलीनीकरणाला वेग येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:16 IST2026-02-03T12:15:42+5:302026-02-03T12:16:25+5:30
अजित पवारांच्या निधनानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.

अदानींची भेट अन् दिल्ली दौरा अचानक रद्द, शरद पवार बारामतीला जाणार; NCP विलीनीकरणाला वेग येणार?
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेनेही जोर धरला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांकडून सातत्याने एक दावा करण्यात येत आहे. मृत्यूपूर्वी अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या बैठकाही अंतिम टप्प्यात आल्या होत्या. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी घोषणाही होणार होती परंतु बारामतीतील विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले आणि सगळे काही बारगळले.
अजित पवारांनी त्यांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे हीच त्यांची अंतिम इच्छा होती असं शरद पवारांच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. खुद्द शरद पवारांनीही या चर्चेला दुजोरा देत सर्व काही ठरले होते. अजित पवार, जयंत पाटील हे चर्चेचे नेतृत्व करत होते असं सांगितले होते. या चर्चेच्या वातावरणात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्या बारामतीला गेल्या आहेत. आज शरद पवार यांनीही त्यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करत बारामतीकडे निघाले आहेत त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
अदानी-शरद पवार भेट
अजित पवारांच्या निधनानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. जवळपास ४५ मिनिटे ते पवारांच्या सिल्व्हर ओक या घरी होते. या भेटीत अदानींनी शरद पवारांचे सांत्वन केले. मात्र अदानी-शरद पवार भेटीमुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या घडामोडीत अदानी यांचीही भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात अदानी यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी दिल्ली दौरा रद्द केला. त्यानंतर ते बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याने राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत मोठी घडामोड घडणार आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरीत्या घेतला आहे. ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असं मत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः 'विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार याबाबत स्पष्टता आवश्यक असून त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही असं तटकरेंनी म्हटलं.