“पिंकी गेली हे टीव्हीवर समजले, बारामतीला पार्थिव आणायला गेलो तेव्हा…”; वडिलांना वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:51 IST2026-01-31T11:47:32+5:302026-01-31T11:51:10+5:30
Pinki Mali News: पिंकी ज्या कंपनीत कामाला होती, त्यांनी अपघाताबाबत काहीच सांगितले नाही. आमची कुणी साधी विचारपूस केली नाही.

“पिंकी गेली हे टीव्हीवर समजले, बारामतीला पार्थिव आणायला गेलो तेव्हा…”; वडिलांना वाईट अनुभव
Pinki Mali News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण पवार कुटुंबियांसह लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी खासदार, आमदारांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच अजित पवार यांच्यासह विमान अपघातात निधन झालेल्या पिंकी माळी हिच्या वडिलांनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर मोठी खंत व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्यासाठी हा प्रवास अखेरचा ठरला. त्यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु, एकीकडे मुलगी गेल्याचे मोठे दुःख असताना दुसरीकडे पिंकीच्या वडिलांना वाईट अनुभव आल्याचे म्हटले जात आहे. ३० वर्षीय लेकीच्या अकाली निधनाने शिवकुमार यांना मोठा धक्का बसला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार यांना केली.
पिंकी गेली हे टीव्हीवर समजले, बारामतीला पार्थिव आणायला गेलो तेव्हा…
पिंकी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीत काम करत होती. या कंपनीने आम्हाला अपघाताची माहिती दिली नाही. आम्हाला अपघाताबद्दल काही सांगितले नाही. टीव्हीवर बातमी आल्यानंतर आम्हाला हे सगळे समजले. आम्ही बारामतीला लेकीचे पार्थिव आणायला गेलो. तिथे कंपनीचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता. समन्वयासाठी कोणीही नव्हते. मी माझ्या मित्रांसोबत बारामतीला गेलो आणि माझ्या लेकीचे पार्थिव घेऊन आलो. सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवकुमार यांनी केली.
दरम्यान, पिंकी माळी हिचे पती सोमविकर सैनी यांनीही या प्रकाराबाबत मोठी खंत व्यक्त केली. आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. कंपनी असो वा सरकार, कोणीही आमच्याशी बोललेलं नाही. आतापर्यंत कंपनीने साधा फोन केलेला नाही. किमान एक कॉल करण्याचे सौजन्य तरी दाखवायला हवे होते. कुटुंबावर इतके मोठे संकट कोसळले आहे, त्यांची अवस्था काय आहे, याची साधी विचारपूस करायला हवी होती.