निवडणूक लढवणं आमच्या रक्तात नाही - राज ठाकरे
By admin | Published: August 24, 2014 06:07 PM2014-08-24T18:07:24+5:302014-08-24T18:27:44+5:30
विधानसभा निवडणूक लढवण्याची मी घोषणा केली. मात्र निवडणूक लढवणं हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही असे सांगत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ - विधानसभा निवडणूक लढवण्याची मी घोषणा केली. मात्र निवडणूक लढवणं हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही. आम्ही एका मतदारसंघापुरता विचार करु शकत नाही आणि महाराष्ट्र हाच माझा मतदार संघ आहे असे सांगत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील इच्छूक उमेदवारांची मुलाखात घेण्यासाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरे रविवारी नागपूरमध्ये होते. या मुलाखातीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राज ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी एखाद्या विभागाचा विचार न करता नेहमीच महाराष्ट्राचा विचार केला. मलादेखील एकाच मतदारसंघात अडकून राहणे आवडणार नाही. महाराष्ट्र हाच माझा मतदार संघ आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यावर अजूनही विचार सुरु असून पुढचं पुढे बघू असे सूचक उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याची गर्जना करणा-या राज ठाकरेंचा उत्साह अवघ्या महिनाभरातच ओसरल्याचे दिसत आहे. तर मनसे कार्यकर्त्यांच्या उत्साहावरही पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांची हुर्रे होत असेल तर त्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उपस्थित न राहणेच बरं आहे असे सांगत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील वातावरण वेगळे असते. भाजपला लोकसभेत मिळालेल्या यशात राहुल गांधींचे मोलाचे योगदान होते असा टोलाही त्यांनी लगावला. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेतील इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेणार नाही असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकांच्या तारखांविषयी निवडणूक आयोग सस्पेन्स का ठेवते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मनसेची ब्लू प्रिंट पुढील दहा दिवसांमध्ये जाहीर करणार असून त्यामध्ये विदर्भासाठी विशेष योजना असेल असे राज ठाकरेंनी सांगितले.
स्वतंत्र विदर्भाला आमचा विरोध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.