'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 06:41 IST2026-02-25T06:40:29+5:302026-02-25T06:41:59+5:30
शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांवरून आ. काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना शिक्षणा राज्यमंत्र्यांनी उलट टोला लगावला.

'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले
मुंबई : राज्यातील शिक्षकांना एकीकडे 'आचार्य' म्हणता आणि दुसरीकडे त्यांना 'भटके कुत्रे मोजायला लावता, हा शिक्षणाचा अपमान आहे,' असा उद्वेग राष्ट्रवादीचे (अजित पवार) आ. विक्रम काळे यांनी मंगळवारी विधान परिषदेत व्यक्त केला. मात्र, काळे हे सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, अनुभवी आहेत. एखाद्या विषयाचा राईचा पहाड करण्यासाठी आपल्या अनुभवाचा फायदा ते घेत असतात, असा टोला लगावत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काळेंचा आरोप फेटाळला.
शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांवरून आ. काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचेच काम द्यावे, यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला.
ते आश्वासन कुठे विरले?
राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्षकांना इतर कोणतेही काम लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शिक्षकांना आता भटक्या कुत्रे मोजण्याचे काम दिले आहे. सरकारकडील अन्य यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना हे काम का दिले जात नाही.
शाळा चालवायची कशी?
एका शाळेतील ६० पैकी ४५ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामाला जुंपले. उरलेले १५ शिक्षक दोन हजार मुलांना कसे सांभाळणार? एका वर्गात ५० ते ६० मुले असतात. शाळा कशी चालवायची? याचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज असून, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी आ. काळे यांनी केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार काम
राज्यमंत्री भोयर म्हणाले, श्वान मोजण्याचे काम शिक्षकांना दिलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, खाद्यपदार्थांची विल्हेवाट, शैक्षणिक प्रिमायसेसला कुंपण घालणे, याची काळजी घेण्याचे काम शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानुसार देण्यात आले आहे.